बापरे! बोटीवर चढणारी बस थेट नदीच्या पात्रात शिरली; बांगलादेशात १६ प्रवाशांना जलसमाधी, बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 07:38 IST2026-03-26T07:37:40+5:302026-03-26T07:38:04+5:30
बांगलादेशात एक भीषण बस अपघात झाला असून ४० प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे.

बापरे! बोटीवर चढणारी बस थेट नदीच्या पात्रात शिरली; बांगलादेशात १६ प्रवाशांना जलसमाधी, बचावकार्य सुरू
ईदच्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करून घराकडे परतणाऱ्या प्रवाशांवर काळाने भीषण घाला घातला आहे. बांगलादेशातील राजबाडी जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस थेट पद्मा नदीत कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ही बस ढाक्याच्या दिशेने परतत असताना दौलतदिया टर्मिनलवर ही दुर्घटना घडली.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेली ही बस दौलतदिया टर्मिनलवरून एका फेरीवर चढत होती. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच वेळी एक छोटी युटिलिटी फेरी पोंटूनला येऊन जोरात धडकली. या धक्क्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस क्षणार्धात अनियंत्रित होऊन खोल पद्मा नदीच्या पात्रात कोसळली.
Big Breaking : A Bus At Daulatdia Ferry Ghat While Trying To Board At Ferry Fallen At Mighty Padma River.
— বাংলার ছেলে 🇧🇩 (@iSoumikSaheb) March 25, 2026
Terrible Terrible News.
Prayers For All pic.twitter.com/TAka8lcQby
बचावकार्य सुरू पण...
अपघातावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. बस पाण्यात पडताच सगळेच जोरजोरात ओरडू लागले. काही प्रवाशांनी खिडकीतून बाहेर उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला, मात्र दुर्दैवाने बहुतांश प्रवासी बसच्या आतच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. खराब हवामान आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली.
एकाच कुटुंबातील अनेकांचा मृत्यू
जेव्हा बस बाहेर काढली गेली, तेव्हा त्यातील दृश्य पाहून बचाव पथकाच्याही डोळ्यात पाणी आले. बसमध्ये १४ मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळले, तर दोन महिलांचे मृतदेह बचाव पथकाला आधीच मिळाले होते. अनेक प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याने या अपघाताचे स्वरूप अतिशय विदारक होते. अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
The Catastrophic Moment When The Bus Fell In Mighty Padma While Boarding In A Ferry.
Unfortunate Unfortunate
I Have Never Seen Scenes Like This In Bangladesh History From A Ferry https://t.co/ej31yNwI7ypic.twitter.com/q2Mm1MYRzh— বাংলার ছেলে 🇧🇩 (@iSoumikSaheb) March 25, 2026
पंतप्रधानांनी दिले चौकशीचे आदेश
या भीषण अपघातावर बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतला असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही सरकारकडून देण्यात आले आहे.