विशेष लेख: इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:43 IST2025-06-21T06:43:09+5:302025-06-21T06:43:50+5:30
iran israel news: इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला.

विशेष लेख: इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा
इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला. विविध कारणांसाठी त्यातही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हजारो भारतीय विद्यार्थी इराणला गेले आहेत. त्यांचं भविष्य आता टांगणीला लागलं आहे. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या या घडीला दहा हजार आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणणं हे भारतापुढचं सध्या मुख्य आव्हान आहे.
इराणमधील काही भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यात आलं आहे, पण तरीही अजून बरेच विद्यार्थी इराणमध्येच अडकून पडले आहेत. इराणमधील बहुतांश विमानतळं सध्या बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इराणमधून कसं बाहेर काढायचं हा भारतापुढे यक्षप्रश्न आहे. रस्तेमार्ग अजून सुरू आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट. त्यामुळे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गानं पहिल्यांदा अर्मेनियामध्ये आणून मग तिथून हवाईमार्गे भारतात आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
पण मग एवढ्या लांबचा मार्ग भारत सरकारनं का निवडला? दुसरा काही मार्ग नव्हता का? - सध्या तरी नाही. इराणच्या सीमेला लागून सात देश आहेत. त्यात पाकिस्तान, अफगानिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, अर्मेनिया, तुर्की आणि इराक या देशांचा समावेश आहे. याशिवाय इराणची समुद्री सीमा ओमानला लागून आहे; पण इतके सारे देश असतानाही अर्मेनियाच का? - तर त्यामागची मुख्य कारणं नकारात्मक आहेत.
इराणशी भारताचे संबंध चांगले असले तरी थेट इराणमधूनच विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं धोक्याचं आहे. कारण इराणमधली बहुसंख्य आंतरराष्ट्रीय उड्डाणं सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. शिवाय इस्त्रायलचे इराणवर हवाई हल्ले आणि इराणी विमानांना लक्ष्य करणं सुरूच आहे.
आपला शेजारी देश पाकिस्तानमधून विद्यार्थ्यांना भारतात आणणं तुलनेनं सोपं आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध खूपच बिघडलेले आहेत. इराक आणि इराणमधून आजही विस्तव जात नाही. त्यामुळे इराकचा मार्ग आपल्यासाठी सुरक्षित नाही. तुर्की हा पर्याय बरा असला तरी इराणपासून रस्तेमार्गानं तिथपर्यंत पोहोचणं फारच लांब आहे. शिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तुर्कीनं भारतावर टीका केली आणि पाकिस्तानला खुलं समर्थन केलं होतं. त्यामुळे तुर्कीचा मार्गही आपल्यासाठी बंद झाला.
शेवटी पर्याय उरतो तो फक्त अर्मेनियाचा. त्यातल्या त्यात अर्मेनियाची सीमा इराणपासून जवळ आहे. अर्मेनिया राजकीयदृष्ट्या स्थिर देश आहे. भारताचे या देशाशी मित्रत्वाचे संबंध आहेत. दोन्ही देशांत सुरक्षा करारही झालेला आहे. इराणबरोबरही त्यांचे चांगले संबंध आहेत. अर्मेनियाची नॉरदूज बॉर्डर सुरक्षित मानली जाते. तिथलं येरेवन एअरपोर्टही व्यवस्थित सुरू आहे. तिथून विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं जास्त सुरक्षित आहे.
इस्त्रायलनं नुकतंच इराणच्या नागरिकांनाही इशारा दिला आहे की इराणची राजधानी तेहरान आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील भागात जे नागरिक राहतात, त्यांनी तातडीनं तिथून निघून जावं. कारण त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सध्या अर्मेनिया हाच ‘खुष्की’चा मार्ग आहे.