कळमनुरी : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने एस. टी.च्या आगार प्रमुखांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पास वितरण करण्याचे आदेश एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा मागील मार्च महिन्यांपासून बंद होत्या. तब्बल दहा महिन्यांच्या कालखंडानंतर कोरोनाबाबतच्या नियम व अटींच्या अधीन राहून तथा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील शाळा मार्च महिन्यापासून बंद होत्या. पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. कोरोना काळातील एस. टी.च्या उत्पन्नाची घट भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पासेस देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्व आगार प्रमुखांनी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एस. टी.ची पास देण्यासाठी संबंधित शाळेत जाऊन पास वितरीत करावेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पासेसची संख्या वाढवून आगाराचे उत्पन्न वाढवावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शाळेत जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधावा व त्यांना पास वितरीत करावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत. सध्या ग्रामीण भागातील बसेस बंद आहेत. शाळा सुरू होणार असल्याने प्रत्येक एस. टी. आगाराला आता ग्रामीण भागात बस सुरू कराव्या लागणार आहेत. येथील आगारातूनही ग्रामीण भागात बसेस सोडण्यात येत नव्हत्या. त्यामुळे आगाराचे उत्पन्न घटत होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थी पासेसची संख्या वाढवून आगाराचे उत्पन्न कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही आगार प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. सध्या आगारातून मुंबई येथे चालक, वाहक ड्युटी करण्यासाठी गेलेले आहेत. चालक, वाहक यांची संख्या कमी असली तरी आगारांना आता ग्रामीण भागात बसेस सोडाव्या लागणार आहेत. येथील एस. टी. आगाराचेही चालक, वाहक मुंबई येथे ड्युटी करण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे येथील आगारात चालक, वाहकांची संख्या कमी आहे. विद्यार्थ्यांची संख्या पाहता ग्रामीण भागातही आगारातून एस. टी. बसेस सोडण्यात येणार असल्याचे स्थानकप्रमुख शेख फेरोज यांनी सांगितले. २७ जानेवारीपासून पुन्हा शाळा गजबजणार आहेत. एस. टी. बसस्थानकावरही आता विद्यार्थ्यांचे घोळके दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एस. टी. पासेस वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत, पूर्वीच्या बसफेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात. विद्यार्थी संख्या लक्षात घेता नवीन मार्गावरही बसफेऱ्या सुरू करण्यात याव्यात, कोरोना काळातील उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना एस. टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील ३१ विभाग नियंत्रकांना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा गजबजणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर पासेसची मागणी वाढणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आगार प्रमुखांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पासचे वितरण करावे, याबाबतचे परिपत्रक एस. टी. महामंडळाने काढले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आता ग्रामीण भागातही बसेस धावणार आहेत.
शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना एस. टी. पासेस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST