लॉकडाऊन : त्रिमूर्तीतील चोरीसाठी ‘पर्वणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:21+5:302021-03-08T04:28:21+5:30
वसमत : लॉकडाऊनचा काळ सुरू असताना, जून २०२० मध्ये वसमतच्या एमआयडीसीमधील ‘त्रिमूर्ती स्टॉक प्लाय’ कारखान्यात चोरीची मोठी घटना ...
वसमत : लॉकडाऊनचा काळ सुरू असताना, जून २०२० मध्ये वसमतच्या एमआयडीसीमधील ‘त्रिमूर्ती स्टॉक प्लाय’ कारखान्यात चोरीची मोठी घटना घडली होती. आता पुन्हा लॉकडाऊन असताना त्याच कारखान्यात चोरीचा प्रकार समोर आला. मात्र ग्रामीण पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडला. दोन वाहनांसह २ लाख साठ ६० हजार रुपये किमतीचा ऐवज ५ मार्च रोजी जप्त केला. यावरून त्रिमूर्तीतील चोरीसाठी लॉकडाऊन पर्वणी ठरत आहे.
हिंगोली जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असताना, वसमत येथील माळवटा एमआयडीसी भागातील त्रिमूर्ती कारखान्यात चोरीचा प्रयत्न होत असल्याची घटना समोर आली. ५ मार्च रोजी चोरट्यांनी कारखान्यातील लोखंडी साहित्य टेम्पाेत भरून नेण्यासाठी तयारी केली. मात्र यावेळी ग्रामीण पोलीस रात्रीच्या गस्तीवर होते. त्यावेळी पोलिसांची गाडी पाहून चोरटे तेथून पळून गेले. यावेळी पोलिसांनी कारखान्याच्या आवारात साहित्य घेऊन उभा असलेला पिकअप (क्र एमएच २६ एडी ७७४७) व होंडा कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच २६ वाय ५८८८) या दोन वाहनांसह २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक, मालक, दुचाकी चालक, मालक व अन्य तीन जणांविरोधात सपोनि विलास चवळी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसमत ग्रामीण पोलिसांनी त्रिमूर्ती कारखान्यातील चोरीचा प्रयत्न रोखला असला तरी, आजपर्यंत यातील किती साहित्य चोरीस गेले, याचा शाेध लावणे अद्याप बाकी आहे. ग्रामीण पोलीस या वाहनाच्या मालकाचा शोध घेऊन त्रिमूर्ती चोरीचे सूत्रधार शोधून काढतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी जाहीर केलेली आहे. तसेच वसमतमध्ये येणाऱ्या जिंतूर फाट्यावर चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टवर त्या वाहनांची नोंद झाली की नाही, याचाही शोध घेण्याची गरज आहे. मागील लॉकडाऊनमध्ये जून महिन्यात त्रिमूर्ती स्टॉक प्लाय कारखान्यातून शेडसह दोन ते तीन कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ‘लोकमत’ने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक केली. तपासात नांदेड व वसमत येथील काही भंगारवाल्यापर्यंत चोरीचे धागेदोरे असल्याचे समोर आले होते. मात्र पुढे काय झाले हे उघड झाले नाही.
शासनाची मालमत्ता असलेला संपूर्ण कारखाना चोरटे चोरून नेतात. या प्रकाराकडे तालुक्यातील कोणीही गांभीर्याने पाहात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खा. हेमंत पाटील यांनी त्रिमूर्ती चोरीप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केली. त्यावरून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही चोरीचा कसून तपास झाला नाही. त्रिमूर्ती कारखान्याचा एक वॉचमन चोरी प्रकरणात निष्पन्न झाला होता. त्याच्या मदतीने काही बड्या मंडळींनी कारखाना साफ केल्याचे वृत्त आहे. या चोरीमधूनच नवीन वाहने खरेदी केल्याची चर्चा आहे. शुक्रवारी पकडलेली वाहनेही त्यातीलच असावीत, असा कयास आहे. त्यामुळे आता पकडलेली वाहने आणि मागील आरोपी याचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.