हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी लागू होताच हिंगोलीकरांची मात्र चांगलीच धांदल उडाल्याचे पहायला मिळाले.
मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे ३८ रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला आहे. हे पाहून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपासून सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केले आहेत. बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गांधी चौक, महावीर चौक, भाजी मंडई, बसस्थानक परिसर, इंदिरा चौक, कापड गल्ली आदी भागांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात येत होते. या पथकात पथकप्रमुख डी. पी. शिंदे, पंडित मस्के,प्रवीण चव्हाण, अमर ठाकूर, पवन खरात यांचा समावेश होता. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ध्वनिक्षेपकाद्वारे शहरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यानंतर सायंकाळी सात वाजता सर्वत्र सामसूम दिसून आल्याचे पहायला मिळाले.