'हाता तोंडाशी आलेला घास हिरावला!'; हिंगोलीत अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:00 IST2026-03-19T11:59:21+5:302026-03-19T12:00:04+5:30
हिंगोली अवकाळी पाऊस: वसमत आणि कळमनुरीत पिके भुईसपाट; केळीच्या बागांना मोठा फटका, गहू आडवा

'हाता तोंडाशी आलेला घास हिरावला!'; हिंगोलीत अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे नुकसान
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गव्हाचे पीक आडवे झाले असून, वसमत तालुक्यात फळ बागांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. १८ मार्चला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वसमत तालुक्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह दोन तास पाऊस झाला. या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. तसेच वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले.
विशेष म्हणजे गहू काढणीला आला असतानाच अवकाळी पावसाचा तडाखा या तालुक्यात बसला आहे. कळमनुरी तालुक्यातही रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला. त्यामुळे भाजीपाला, गहू, हरभरा, करडई या पिकांना फटका बसला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गारपीट झाली. या भागातील पिकांचीही मोठी हानी झाली आहे.