सिंचन विहीर 'चोरीला' गेल्याचा संताप; निधीचा अपहार, विहिरीत शेतकऱ्यांचे 'आत्मक्लेश' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:20 IST2026-03-14T16:18:44+5:302026-03-14T16:20:02+5:30
कागदोपत्री विहीर दाखवून १.७५ लाखांचा अपहार; धनगरवाडीत शेतकऱ्यांनी बाजेवर बसून पुकारला एल्गार

सिंचन विहीर 'चोरीला' गेल्याचा संताप; निधीचा अपहार, विहिरीत शेतकऱ्यांचे 'आत्मक्लेश' आंदोलन
सेनगाव (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीच्या अनुदानात गंभीर अपहार झाला आहे. कागदोपत्री विहीर दाखवून शासनाचा निधी लाटल्याच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी १३ मार्चपासून धनगरवाडी येथे विहिरीत ‘आत्मक्लेश’ आंदोलन सुरू केले आहे.
धनगरवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन ‘मनरेगा’ योजनेंतर्गत कागदोपत्री सिंचन विहीर दाखवून शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेतकरी रामचंद्र शंकर खडसे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतात सिंचन विहीर मंजूर झाल्याचे दाखवून १ लाख ७५ हजार ७२४ रुपयांचा निधी लाटण्यात आला.
या प्रकरणात संतोष किसन कोरडे हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही दोन संबंधित आरोपी मोकाट फिरत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आरोपींना तत्काळ अटक झाली नाही तर पुरावे नष्ट होण्याची, तसेच सरकारी दस्तऐवज व जिओ- टॅगिंगच्या पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. घोटाळ्याची व्याप्ती केवळ एका प्रकरणापुरते मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यात असे अनेक प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
६० फूट खोल विहिरीत बाजेवर आंदोलन
शेतकऱ्यांनी १३ मार्चला सकाळीच गावातील विठ्ठल तिडके या शेतकऱ्यांच्या ६० फूट खोल असलेल्या विहिरीत अंदाजे ५० फूट खोल अंतरावर ‘बाज’ बांधून आंदोलन सुरू केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विविध घोषणा देत भ्रष्ट यंत्रणेला निषेध व्यक्त केला. सकाळी दहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळी पंचायत समितीचा कर्मचारी हजर नव्हता. गोरेगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदोलनात श्रीराम जगताप, रामचंद्र खडसे, विनोद खडसे, रुस्तुमा होळपादे, बळीराम रवणे, प्रल्हाद गबारे, माधव खडसे, गौरव पाळते, आदींचा समावेश आहे.