सोशल मीडियावरील अफवांनी मासिक पाळीच्या आरोग्याला धोका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:54 IST2025-05-28T08:53:33+5:302025-05-28T08:54:02+5:30
महिलानी यादरम्यान केस धुणे, टॅम्पॉन्स टाळावे का?

सोशल मीडियावरील अफवांनी मासिक पाळीच्या आरोग्याला धोका!
नवी दिल्ली : बहुतेक भारतीय महिला मासिक पाळीबद्दल माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाला चांगला स्त्रोत मानतात, मात्र सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीचा मासिक पाळीच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. ‘एव्हरटीन मासिक स्वच्छता सर्वेक्षण’मधून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी ७२.४ टक्के महिला १९-३५ वयोगटातील होत्या. यातील ७६.६ टक्के महिलांनी पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण पूर्ण केले होते.
सोशल मीडियावर खोटी माहिती?
उशिरा मासिक पाळी येणे म्हणजे पोलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज (पीसीओडी) आहे.
मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी लिंबूपाणी किंवा कॉफी पिण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मासिक पाळीत व्यायाम केल्यास शरीराला इजा होईल.
मासिक पाळीचे रक्त अपवित्र असते, या दरम्यान महिलांनी धार्मिक स्थळांना भेट देऊ नये, लोणचे किंवा आंबवलेले पदार्थ यांना स्पर्श करू नये.
मासिक पाळी दरम्यान केस धुणे टाळावे, दूध आणि दही सारखे पांढऱ्या रंगाचे पदार्थ टाळणे, मासिक पाळीच्या वेळी महिला गर्भवती होऊ शकत नाहीत.
टॅम्पॉन्स वापरल्यामुळे जननेंद्रीय मोठे होते तर मासिक कप वापरण्याबाबत भीती निर्माण करणारी माहितीही पसरविली जात होती.
इन्फ्लूएन्सर्सवर विश्वास
भारतातील दोन-तृतीयांश पेक्षा जास्त महिला माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. यामुळे इन्फ्लूएन्सर्स आणि ब्लॉगर्स मासिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात उत्तम कार्य करत असल्याचे दिसते.
८७.८% महिला मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वापरत आहेत.
८२.७% महिलांना पाळीदरम्यान सौम्य ते तीव्र वेदना झाल्या.
७१.६% महिलांना वाटते की, मासिक पाळीबाबत सोशल मीडियावर पुरेशी माहिती मिळते.
४१.५% महिलांनी पाळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे वेदना कमी करणारे औषध वापरले नाही.
१४.२% महिलांनी वेदनाशामक गोळ्यांचा वापर केला.