कडक ऊन... कार भट्टीसारखी तापली... दिवसभर गाडीत राहिलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यावं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:34 IST2026-04-11T09:32:56+5:302026-04-11T09:34:24+5:30
Old Water Bottle Side Effects : कधीतरी कामात पडेल म्हणून विकत घेतलेली प्लास्टिकची पाण्याची बॉटल न फेकता कारमध्येच अनेक दिवस ठेवली जाते. काही दिवसांनी तेच पाणी प्यायलं जातं. पण हे पाणी सुरक्षित असतं का?

कडक ऊन... कार भट्टीसारखी तापली... दिवसभर गाडीत राहिलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यावं का?
Old Water Bottle Side Effects : बरेच तास कार कडक उन्हात उभी असेल आणि अचानक आपण कारमध्ये जाऊन बसता तेव्हा जो काही उकाडा असतो तो सहन होत नाही. उन्हाळ्यात जवळपास सगळ्याच गाड्यांची हालत अशीच असते. या दिवसात कारने लांबचा प्रवास करायचा म्हटला तर हालत खराब होते. आपण बघतो की, कारने कुठे लांबचा प्रवास करत असताना आपण बाहेरून पाण्याची बॉटल विकत घेतो आणि त्यातील थोडं पाणी पिऊन तशीच कारमध्ये ठेवतो. नंतर कधीतरी कामात पडेल म्हणून ही बॉटल न फेकता कारमध्येच अनेक दिवस ठेवली जाते. काही दिवसांनी तेच पाणी प्यायलं जातं. पण हे पाणी सुरक्षित असतं का? याचा कधी फारसा कुणी विचार करत नाही. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आलाय.
सुरक्षित असतं का गाडीत ठेवलेलं पाणी?
ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मनन वोरा सांगतात की, कारमध्ये ठेवलेल्या जु्न्या बॉटलमधील पाणी पिणं खूप जास्त घातक ठरू शकतं. आपल्याला माहीत असेलच की, कार जेव्हा कडक उन्हात उभी राहते, तेव्हा कार आतून खूप तापलेली असते. या उष्णतेमुळे प्लास्टिकची बॉटल झिजू लागते म्हणजे डिग्रेड होऊ लागते. अशात प्लास्टिकमधील घातक रसायनं पाण्यात मिसळतात. हे पाणी प्यायल्यावर यातील केमिकल्स शरीरातील हार्मोन सिस्टीमचं नुकसान करतात. इतकंच नाही तर या केमिकल्समुळे आरोग्याचं मोठं नुकसानही होतं. या पाण्याने डोकेदुखी, पोट बिघडणे आणि हार्मोनमध्ये असंतुलन अशा समस्यांचा धोका खूप असतो. त्यामुळे हे पाणी न पिता फेकण्याचा सल्ला ते देतात.
मिनरल वॉटर सेफ असतं का?
अनेक लोक विचार करतात की, मिनरल वॉटर बॉटल सुरक्षित असते. त्यामुळे हे बरेच दिवस कारमध्ये तसंच राहिलेलं पाणी प्यायल्याने काही होणार नाही. पण सत्य तर हे आहे की, बॉटल कोणत्याही ब्रॅन्डची असो, ती प्लास्टिकचीच असते. बॉटल गरम झाल्यावर त्यातील तत्व पाण्यात मिक्स होतात. त्यामुळे अशा बॉटल कारमध्ये जास्त वेळ ठेवणं योग्य नाही आणि त्यातील पाणी पिणं तर अजिबातच योग्य नाही. कारने कुठे जाणार असाल तर स्टीलच्या बॉटलमध्ये घरातून पाणी घ्या किंवा पाण्याची बॉटल घेतली तर ती लगेच संपवा.
पाण्याची नसते एक्सपायरी डेट, पण...
जर पाण्याची एक्सपायरी डेट नसते तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिली जाते? तर याचं उत्तर असं आहे की, पाण्याची जरी एक्सपायरी डेट नसली तरी, पाणी स्टोर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बॉटलची नक्कीच एक्सपायरी डेट असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.