रात्रीचे उरलेले अन्नपदार्थ सकाळी खात असाल तर सावधान; शिळे अन्न ठरू शकते आरोग्यासाठी घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:25 IST2026-02-13T10:25:07+5:302026-02-13T10:25:44+5:30
खराब झालेले अन्न खाल्ल्यामुळे जुलाब, उलट्या आणि तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसतात.

रात्रीचे उरलेले अन्नपदार्थ सकाळी खात असाल तर सावधान; शिळे अन्न ठरू शकते आरोग्यासाठी घातक
मुंबई : घरातील सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न फेकून द्यायला जिवावर येते, म्हणून ‘अन्न वाया नको’ या भावनेतून बहुतांश गृहिणी उरलेले शिळे अन्न स्वतः खातात. मात्र, हीच सवय त्यांच्या आरोग्यासाठी महाग पडू शकते. सतत शिळे अन्न खाल्ल्याने केवळ पोटाचे विकारच नाही, तर फूड पॉयझनिंग आणि संसर्गाचाही मोठा धोका निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
का टाळावे शिळे अन्न?
रात्रीचा उरलेला भात सकाळी फोडणी देऊन खाणे किंवा रात्रीची भाजी-पोळी नाश्त्यात संपवणे ही अनेक घरांतील रीत आहे. जवलेले अन्न ८-१० तासांनंतर आपले पोषक घटक गमावते. अन्न शिजवल्यानंतर ठराविक काळानंतर त्यात सूक्ष्मजंतूंची वाढ होऊ लागते.
हवामानाचा परिणाम
भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे अन्न लवकर खराब होते. अशा वातावरणात अन्नामध्ये बुरशी आणि विषाणूंची वाढ होण्यासाठी पोषक स्थिती असते.
फूड पॉयझनिंग, इन्फेक्शन
खराब झालेले अन्न खाल्ल्यामुळे जुलाब, उलट्या आणि तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न मिळाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन गंभीर संसर्ग होऊ शकतो.
शिळे अन्न सतत खाल्ल्याने शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते. यामुळे छातीत जळजळ, पोट फुगणे, अपचन आणि सुस्ती येते. आतड्यांना सूजही येते.- डॉ. सुलक्षणा यादव, वैद्यकीय अधिकारी
गृहिणींनो, ही काळजी घ्या...
नेहमी गरजेनुसारच अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा. अन्न उरलेच तर ते व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवा आणि दुसऱ्यांदा खाताना नीट गरम करा. जर अन्नाचा रंग बदलला असेल किंवा त्यावर चिकटपणा आला असेल, तर ते अजिबात खाऊ नका. स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करून अन्नाची बचत करू नका.
फ्रिजमधील अन्नही असुरक्षित
अनेकांना वाटते की फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खराब होत नाही; परंतु फ्रिज बॅक्टेरियाची वाढ पूर्णपणे थांबवू शकत नाही, ती फक्त मंद करतो. अन्नाला दुर्गंधी येत नाही म्हणजे ते चांगले आहे, हा समज चुकीचा आहे.