लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा नगरपंचायतला १० वर्षे लोटली तरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट असून आजही अनेक ठिकाणी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. नगरपंचायत क्षेत्रात आतापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल नळ योजना बेपत्ता असून प्रत्येक घरी नळ आणि त्या नळाला शुद्ध पाणी केव्हा मिळेल हे अजिबात सांगता येत नाही.
सन २०१५ मध्ये सालेकसा नगरपंचायतची घोषणा झाल्यानंतर २०१७ ते २०२२ या कालावधीत लोकशाही पद्धतीने नगरपंचायतवर सत्ता स्थापित झाली होती. तेव्हा नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक नगरपंचायतवर निवडून गेले. त्यापैकी चार नगरसेवकांना सभापतीपद मिळाले यामध्ये शिक्षण व आरोग्य, अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता सभापतींची निवड झाली. अशात नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींनी नगरपंचायत क्षेत्रात शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जे काही प्रयत्न केले असतील त्यात ते अपुरे पडले आणि नगरपंचायत क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही.
आजही काही भागात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असून, पाणीपुरवठा योजनेंतर्गत महिला व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गरीब गरजू कुटुंबांना नगरपंचायतद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते. तर दुसरीकडे नगरपंचायतची पाणी पुरवठा व्यवस्था तोकडी ठरत आहे.
नगरपंचायत प्रशासनामार्फत मागील नगरपंचायत रचनेप्रमाणे सालेकसा क्षेत्रात एकूण १७ ठिकाणी सौर उर्जेची जोडणी करून बोअरवेलच्या माध्यमातून गावातील प्रमुख ठिकाणी नळ योजना लावण्यात आली आहे. परंतु यापैकी अनेक ठिकाणी नळ योजना बंद पडली असून जिथे सुरू आहे तिथे लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. कारण, एकाच ठिकाणी नळ असल्यामुळे संपूर्ण मोहल्ल्यातील लोक त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येतात. अशात पाण्याची समस्या अजून दूर झालेली नाही. सालेकसा परिसरात बाकलसर्रा, जांभळी, सालेकसा, हलबीटोला या ठिकाणी पाण्याची समस्या कायम आहे.
दोन बोअरवेलच्या माध्यमातून सहा हजार लोकांना पाणी पुरवठानगरपंचायत अंतर्गत खामगाव खुर्द परिसरात लोकांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी दोन बोअरवेलच्या भरोवशावर अवलंबून रहावे लागत आहे. यामध्ये पंचायत समिती परिसरात असलेल्या एक बोअरवेल द्वारे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरून गावाला पुरवठा केला जातो. तर रेस्ट हाऊस परिसरात असलेली दुसरी बोअरवेल रेल्वे स्थानक परिसरातील वस्तीमध्ये पाणीपुरवठा करीत आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याची टाकी भरण्यासाठी पाच ते सहा तास एवढा वेळ लागत असतो. पाच ते सहा हजार लोकांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही.
शहराला ६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षाशहरासह नगरपंचायत परिसरातील जवळपास आठ गावांना नियमितरित्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत ६७ कोटींची पाणी पुरवठा योजना मंत्रालयातून मंजूर करून घेण्यासाठी प्रतीक्षा केली जात आहे. शहरातील लोकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल याची उत्सुकता येथील नागरिकांना लागली आहे. ही योजना तयार झाल्यावर लोकांना नियमित मुबलक पाणी उपलब्ध होईल. परंतु मंजुरी केव्हा मिळेल आणि काम केव्हा होणार हे सांगता येत नाही.
"नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर करवून घेण्यासाठी स्थानिक आमदार तसेच संबंधित मंत्रालयात सतत पाठपुरावा केला जात आहे. योजना तयार झाल्यावर पाण्याची समस्या कायमची दूर होईल."- शालिनी बडोले, सामाजिक कार्यकर्ता, सालेकसा