समस्या सोडविण्यात तहसील कार्यालय अपयशी
By Admin | Updated: October 26, 2015 01:56 IST2015-10-26T01:56:01+5:302015-10-26T01:56:01+5:30
तालुक्याचा विकास व प्रगतीसाठी मागील वर्षी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. तालुक्यात आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्र-उपकेंद्र सुरू करण्यात आले.

समस्या सोडविण्यात तहसील कार्यालय अपयशी
गोपालदास अग्रवाल यांचे प्रतिपादन : महालगाव येथे नागरिक समाधान शिबिर
गोंदिया : तालुक्याचा विकास व प्रगतीसाठी मागील वर्षी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. तालुक्यात आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्र-उपकेंद्र सुरू करण्यात आले. तसेच रहदारीसाठी रस्त्यांचे जाळे पसरविण्यात आले. याच क्रमाने विभाग प्रयत्न करता तर निश्चितच आणखी विकास होवू शकला असता. आज या नागरिक समाधान शिबिराच्या माध्यमाने सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु तालुक्यातील सर्व कार्यांचे केंद्र असलेल्या तहसील कार्यालयात केवळ भ्रष्टाचाराचे जाळे पसरले आहेत. त्यामुळे सामान्य जणांच्या समस्या सोडविण्यात तहसील कार्यालय अपयशी ठरत आहे, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील महालगाव येथे स्थानिक नागरिकांच्या शासकीय समस्या सोडविण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिक समाधान शिबिर घेण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी केएनके राव, तहसीलदार पवार, जि.प. सदस्य व महिला बालकल्याण सभापती विमल अर्जुन नागपुरे, पं.स. सभापती स्रेहा गौतम, पं.स. सदस्य नीता अशोक पटले आदी उपस्थित होते.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, सामान्य नागरिक आपल्या अधिकाराच्या रेशनापासून वंचित आहेत. तहसील कार्यालयात गळ्यापर्यंत खाण्याचे काम सुरू आहे. एका व्यक्तीच्या जमिनीवर सहजतेनेच दुसऱ्या व्यक्तीचे नाव चढविले जाते. परंतु खऱ्या मालकाचे नाव पुन्हा चढविण्यासाठी वर्षानुवर्षे पेसी चालते. बोगस कागदपत्रांच्या आधारावर दलालांमार्फत एका व्यक्तीचे एकाच दिवसात जात प्रमाणपत्र बनविल्या जाते. मात्र खऱ्या व्यक्तींना महिनोमहिने रांगेत फिरावे लागते. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई महिनोमहिने बँकेत ठेवल्या जाते. मात्र शेतकऱ्यांवर मरणाची पाळी येईपर्यंत त्याच्या वितरणाकडे तहसील कार्यालय लक्ष देत नाही. अशास्थितीत सामान्य नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष पसरले असून शासनाला आता समाधान शिबिर आयोजित करण्याची गरज पडली. जर तहसील कार्यालयात सामान्य नागरिकांचे काम नियमानुसार व वेळेवर करण्यात आले तर समाधान शिबिरांची गरजच पडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सदर शिबिरात ग्रामीण क्षेत्राशी संबंधित जवळपास सर्वच विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांद्वारे २०० पेक्षा अधिक समस्या निपटाऱ्यासाठी अर्ज सादर करण्यात आले. त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश आ. अग्रवाल यांनी संबंधित विभागांना दिले.
याप्रसंगी पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, पं.स. काँग्रेस नेते चमनलाल बिसेन, जि.प. काँग्रेस पक्षनेते रमेश अंबुले, जिल्हा परिषद सदस्य सदस्य सीमा मडावी, विजय लोणारे, शेखर पटले, विठोबा लिल्हारे, पं.स. सदस्य अनिल मते, माधुरी हरिणखेडे, हरिचंद कावडे, सारंग भेलावे, इंद्राणी धावडे, योगराज उपराडे, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, निता अशोक पटले, प्रिया रणजित मेश्राम, प्रमिला करचाल, खंडविकास अधिकारी वालकर, माजी पं.स. सदस्य कौशल्या बोपचे, लोकचंद दंदरे, मनीष मेश्राम, फत्तेचंद शेंडे, लक्ष्मी रहांगडाले, विद्या भालाधरे, रामेश्वर हरिणखेडे, सरिता अंबुले, दिगंबर बघेले, रणजित मेश्राम, प्रकाश रहमतकर, शोभेलाल पारधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)