जिल्ह्यातील तालुके झाले लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:19+5:30

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शासनातर्फेआवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

Tahsils of district became lockdown | जिल्ह्यातील तालुके झाले लॉकडाऊन

जिल्ह्यातील तालुके झाले लॉकडाऊन

ठळक मुद्देपुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना। कोरोना इफेक्ट, जीवनावश्यक सेवा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभुमीवर शनिवारी (दि.२१) जिल्ह्यातील सात ही तालुक्यात स्थानिक नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे सातही तालुक्यात लॉक डाऊनचे चित्र होते. सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव येथील आठवडी बाजार सुध्दा बंद ठेवण्यात आले होते.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शासनातर्फेआवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात अद्यापही एकही कोरोना बाधीत किंवा संशयीय रूग्ण आढळलेला नाही. मात्र जिल्हा प्रशासनातर्फेआवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पानठेले आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी (दि.२१) तालुका स्तरावर नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घेत तालुका स्तरावरील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले. यातून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाकडून यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत आपली प्रतिष्ठाने न उघडण्याचे निर्देश दिले आहे. तर काही ठिकाणाचे आठवडी बाजार सुध्दा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील सातही तालुक्यात लॉक डाऊनचे चित्र होते. तर काही व्यावसायीकांनी स्वत:हून आपली प्रतिष्ठाने बंद करुन प्रशासनाला सहकार्य केले.
जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (दि.२२) जनता का कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला जिल्हा व ग्रामीण भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने शनिवारी (दि.२१) गावांमध्ये दवंडी देऊन जनता का कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. तर व्यापारी संघटनानी सुध्दा यात सहभागी होत जनता का कर्फ्यूला प्रतिसाद देण्यास नागरिकांना सांगितले.
सोशल मीडियावरुन जनजागृती
कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र उपाय योजना केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता का कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. याची फेसबुक आणि व्हाटसअ‍ॅपवरुन जनजागृती केली जात असून आय स्पोर्ट जनता का कर्फ्यू असा संदेश दिला जात आहे. विशेष म्हणजे यात युवक, सामाजिक व राजकीय संघटनांनी देखील पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.
रेल्वे वाहतूक बंद असणार
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे विभागाने रविवारी (दि.२१) देशभरातील रेल्वे सेवा १२ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सुटणाºया सर्व २८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील बाजारपेठ राहणार बंद
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभुमीवर रविवारी शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. यातून केवळ जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. तर शहरातील बाजारपेठ सुध्दा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी (दि.२१) घेण्यात आला.

Web Title: Tahsils of district became lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.