मटण पार्टी करणारे चार कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: January 28, 2015 23:34 IST2015-01-28T23:34:37+5:302015-01-28T23:34:37+5:30
नगर परिषदेद्वारा संचालित शहरातील माताटोली हायस्कूलमध्ये मटण पार्टी करणाऱ्या चौघांवर अखेर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. सोमवारी तसे आदेश

मटण पार्टी करणारे चार कर्मचारी निलंबित
न.प. शाळेतील प्रकरण : वरिष्ठांनी तडकाफडकी दिले आदेश
गोंदिया : नगर परिषदेद्वारा संचालित शहरातील माताटोली हायस्कूलमध्ये मटण पार्टी करणाऱ्या चौघांवर अखेर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. सोमवारी तसे आदेश चौघांनाही पाठविण्यात आले आहेत. विद्येच्या मंदिरात, त्यातही गणराज्य दिनी शाळेतील कर्मचाऱ्यांकडूनच असे कृत्य करण्यात आल्याने शहरवासीयांत या प्रकाराबद्दल चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे.
एकीकडे गणराज्य दिन सर्वत्र जल्लोष व उत्साहात साजरा केला जात असताना माताटोली न.प. शाळेतील काही कर्मचारी मात्र तेवढ्याच उत्साहात शाळेतील भांडारकक्षात मटन पार्टी साजरी करीत होते. शाळेतील एका व्यक्तीच्या जन्मदिनाचा ‘एंजॉयमेंट’ सुरू असल्याची कुणकुण लागताच काही लोक तिथे पोहोचले आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले. यादरम्यान तिथे उपस्थित काही शिक्षक पसार झाले तर शाळेचे परिचर मोहम्मद इरशाद शेख, रविकांत शर्मा, विनोद टेंभूर्णे व अनिल तिडके हे चौघे रंगेहात मिळून आले होते.
घडलेल्या प्रकाराबाबत नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी व नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना माहिती देण्यात आली होती. यावर मुख्याधिकारी मोरे यांनी प्रशासकीय अधिकारी राणे यांना घटनास्थळी पाठविले होते. राणे यांनी शाळेत जाऊन पार्टी करण्यात आलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तर नगराध्यक्ष जायस्वाल यांनी या चौघांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. (शहर प्रतिनिधी)
इतरांवरही होणार का कारवाई?
शाळेत मटण पार्टी करताना रंगेहात मिळून आलेल्या इरशाद शेख, रविकांत शर्मा, विनोद टेंभुर्णे व अनिल तिडके या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२७) सायंकाळी चौघांच्या निलंबन आदेशावर मुख्याधिकारी मोरे यांनी सायंकाळी स्वाक्षरी केली. बुधवारी (दि.२८) सकाळी या चौघांच्या निलंबनाचे आदेश शाळेत पाठविण्यात आले. मात्र इतर सहभागी शिक्षकांवर कारवाई होणार का? अशी चर्चा आहे.
कोणाच्या जन्मदिवसाची पार्टी?
मटण पार्टी करताना चौघे मिळून आले हे जरी खरे असले तरी या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण असे की, एका व्यक्तीच्या जन्मदिनाची पार्टी साजरी करण्यासाठी या चौघांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार ते चौघे शाळेत अन्य पाहुण्यांच्या खातरदारीसाठी तत्पर होते, अशी माहिती आहे. यातील अन्य पाहुणे निसटून गेले व हाती आलेले हे चौघे मात्र अडकले.