अर्जुनी-मोरगाव : येत्या २७ तारखेपासून इयत्ता ५ ते ८ पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. लॉकडाऊन काळात शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता ऑफलाईन अभ्यासक्रम सुरू होत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही याकरिता शाळा दक्ष आहे. त्यासाठी शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांत समन्वय असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची प्रगती हेच माझे ध्येय, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक संघ, कोविड- १९ व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी पर्यवेक्षिका छाया घाटे व पालक-शिक्षक संघ सहसचिव शीला कापगते प्रामुख्याने उपस्थित होते. पालक-शिक्षक सभा अंतर्गत लॉकडाऊन काळात शिकविलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाची उजळणी घेणे, एका बेंचवर दोन विद्यार्थी बसविणे, आजारी विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेणे, कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे, शाळा दररोज सॅनिटाईज करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, शालेय पोषण आहार वाटप, पालकांच्या अभ्यासविषयक अडचणी आदी विषयांवर चर्चा करून पालकांनी एकमताने ठरावास मंजुरी दिली. प्रास्ताविक पर्यवेक्षिका घाटे यांनी केले. सभेला एकूण ८५ पालकांची उपस्थिती होती.