पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:37 IST2018-06-12T22:37:22+5:302018-06-12T22:37:22+5:30

मृग नक्षत्र लागताच लगेच दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात सुध्दा गारवा निर्माण झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे.

The start of the work of sowing started | पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात

पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात

ठळक मुद्देमृगधारा बरसल्याने शेतकरी आनंदी : धान खरेदी केंद्रावर गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मृग नक्षत्र लागताच लगेच दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात सुध्दा गारवा निर्माण झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतावर पºहे टाकण्याची कामे जोमाने सुरु झाली आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार, धुरे दुरुस्त करणे, शेतीची सफाई करणे इत्यादी कामे जवळपास संपविली होती. मृग लागला की पऱ्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकऱ्यांना पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीची नागरणी करणे आवश्यक असते.
अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता. मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकऱ्यांची कामे सुरु झाली. प्रत्येक शेतकरी धान खरेदी करुन किंवा मागील वर्षीचे ठेवलेले बियाणे वापरुन पेरणी करीत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन सामान्यत: १२ जून पर्यंत होत असते. त्यानुसार १२ ते १६ जून दरम्यान एकदा पाऊस येण्याची दाट शक्यता असते. अशात मशागत करुन ठेवलेल्या शेतात ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली तर ते व्यवस्थित उगवतात, असा समज असून अनेकांचे प्रयोग यशस्वी होतात. परंतु यंदा लगेच पावसाने हजेरी लावल्याने आणि सगळ्यांना पेरणीची संधी लाभली.
धान पेरणीची कामे साधारणत: जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केलेले उत्तम असते. परंतु पावसाच्या लहरीपणात कधीकधी पेरणी मागे पुढे होत असते.
समाधानकारक पावसाची अपेक्षा
यंदा हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास केला तर मान्सून चांगला येणार असून पिकासाठी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. आजचा शेतकरी काही प्रमाणात आपल्या पारंपरिकरित्या पावसाचा अंदाज लावतात. परंतु आता जास्तीत जास्त शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवू लागला आहे. अनेकवेळा हवामान खात्याचे भाकित सुद्धा फोल ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी सावध पवित्रा घेत शेतीचे नियोजन तयार करतात.पाऊस कमी जास्त झाला तरी भरघोष पीक घेण्यासाठी नियोजनबद्ध शेतीची कामे करतात.
कृषी केंद्रावर एकच गर्दी
पेरणीची लगबग सुरु झाली असून अनेक शेतकरी दरवर्षी सुधारित वाणाचे बियाणे खरेदी करतात. काही शेतकरी संकरीत वाण टाकण्याला महत्व देतात. त्यासाठी कृषी केंद्रावर जाऊन नवीन वाणाच्या धानाची किंवा जास्त उत्पादन देणाºया वानाची खरेदी करु लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. अशात अनेक कृषी केंद्र चालक संधीचा उपयोग घेत गैरलाभ घेण्याचासुद्धा प्रयत्न करतात आणि बोगस बियाणेसुद्धा शेतकºयांच्या हातात थोपवितात. अशात प्रत्येक शेतकऱ्याने सावधतेने बियाणे खेरदी करुन पेरणी करावी. पेरणीची वेळ निघाल्यास उत्तम प्रतिची बियाणेसुद्धा कामाची राहत नाही.

Web Title: The start of the work of sowing started

टॅग्स :Farmerशेतकरी