वणवा थांबविण्यासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:15 IST2019-04-12T21:15:10+5:302019-04-12T21:15:49+5:30
दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो.

वणवा थांबविण्यासाठी जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलातआग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. या सर्व बाबी लक्षात घेता वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने जंगलातील वनवा थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
येथील वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समिती (नवाटोला) तसेच बिजेपार येथील समिती गावागावात जाऊन लोकांशी संपर्क करीत गावात सभा व बैठका आयोजित करुन गावकऱ्यांना समजाविण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहेत.
जंगलाला वनवा लागला तर वन संपत्तीचे मोठे नुकसान होते. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका मानवी जीवनावर सुद्धा पडतो आणि वनोपजावर अवलंबित गावांना याचा परिणाम सुद्धा भोगावा लागतो. कारण की वनातून मिळणाºया उत्पादनापासून अनेकांना रोजगार सुद्धा मिळतो. परंतु काही लोक वन संपत्तीचा महत्व न समजता वनात आग लावण्याची चूक करतात याबाबत समजाविले जात आहे.
वन व्यवस्थापन समिती आणि वनकर्मचारी, वनात आग लावणे कायद्यान्वये गुन्हा असून गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपी शिक्षेस पात्र ठरु शकतो. अशात लोकांनी कायद्याचे उलंघन करु नये याबाबतही समजावून सांगत आहेत.
जनजागृती करणाऱ्यांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोलाचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे, सचिव (वनरक्षक) सुरेश रहांगडाले, कोषाध्यक्ष संतोष कोडवती, सदस्य महेश वरकडे व इतर सदस्य सहकार्य करीत आहेत. याशिवाय नवाटोला येथील काही सुज्ञ नागरिक सुद्धा इतर गावातील अनेक लोकांना आग लागल्यापासून जंगलाना वाचविण्याचे आवाहन करीत आहेत. त्याचप्रमाणे बिजेपार परिसरातील समितीचे लोक आणि वन कर्मचारी सुद्धा गावागावात जनजागृती करीत आहेत.
ती आग विझविण्यात यश
मागील आठवड्यात एफडीसीएमच्या कक्ष क्र.४६५ मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागण्याची घटना घडली. परंतु संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग तसेच एफडीसीएमच्या कर्मचाºयांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवित आग विझविली व मोठे नुकसान टाळले. या मोहिमेत गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य केले.
कशामुळे लागतो वणवा?
जंगलात मोहफुल वेचणारे लोक मोहाच्या झाडाखालील परिसरात स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळा जाळतात. परंतु तो पाला पाचोळा जळताना संपूर्ण जंगलात आग पसरते. याशिवाय गुरे चारणारे किंवा वनोपज संकलित करण्यासाठी जंगलात भटकणारे लोक जंगलात आग लावण्यास कारणीभूत असतात. परंतु त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वनस्पती, किमती लाकडे आणि शेकडो वन्यजीवांना धोका निर्माण होतो. बिळात राहणारे व सरपटणारे जीव आपला प्राण गमावून बसतात. आगीत हिरवी वनस्पतीसुद्धा जळून गेल्याने एकीकडे झाडांचे नुकसान होतो तर त्यासोबतच तृणभक्षी प्राण्यांचा चारा सुद्धा हिरावतो.