रेल्वे स्थानकावर वृद्धांची फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:59+5:302016-03-20T02:13:59+5:30

गोंदिया जिल्ह्यातील काचेवानी रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे.

Older children at the railway station | रेल्वे स्थानकावर वृद्धांची फजिती

रेल्वे स्थानकावर वृद्धांची फजिती

काचेवानी रेल्वे स्थानक : नागरिकांची उड्डाण पुलाची मागणी
काचेवानी : गोंदिया जिल्ह्यातील काचेवानी रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे. मात्र अदाणी पावर प्लांटमध्ये दोन्ही मार्गाने कोळशाची वाहतूक होत असल्याने व स्थानकावर उभ्या असणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यात वृद्धांची प्रवाशांची खूप फजिती होत असून रेल्वेची स्वस्त, सुरक्षित व परवडणारी सुविधा असताना त्यांना जास्त पैसे खर्च करून बसने प्रवास करावा लागत आहे.
काचेवानी रेल्वे गेट आणि रेल्वे स्थानक हे दोन्ही आवागमन करणाऱ्या नागरिकांकरीता डोकेदुखी ठरत आहे. रेल्वे स्थानकाच्या क्रमांक १ आणि ४ फलाटावर नेहमी रेल्वे गाड्या थांबलेल्या असतात. मध्यभागी असलेल्या फलाटावर ये-जा करण्याकरिता रेल्वे गाडीच्या आतून ये-जा करावी लागत आहे.
त्यामुळे प्रवाशांचे कपडे खराब होत असून कित्येकांचे कपडे फाटले आहे. म्हातारे या गाड्या ओलांडून कसे जात असतील आणि किती त्रास होत असेल हे रेल्वे विभागाला समजून घेण्यासारखे आहे.
आजघडीला २४ तासांत सुमारे १६० गाड्या येथील दोन्ही फलाटांवरून धावतात. त्यामुळे मालवाहक गाड्या लहान रेल्वे स्थानकावर नेहमी थांबविल्या जातात. रेल्वे स्थानक प्रशासकांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. अदाणी पावर प्लांटमध्ये गुजरातवरून कोळशा आणला जातो व या गाड्या क्रमांक १ च्या फलाटावर थांबविल्या जातात. त्यामुळे दोन्ही मार्गाने प्रवास करणाऱ्यांना या कोळशापासून खूप त्रास सहन करावा लागत आहे. अपवाद वगळता अधिकतर वेळी या स्थानकावर नेहमी गाड्या थांबलेल्या दिसतात. त्यामुळे या स्थानकावर ओव्हरब्रीजची आवश्यकता आहे. त्याच बरोबर काचेवानी रेल्वे फाटकावरसुध्दा यापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागत आहे.
गाड्यांची संख्या वाढल्याने १० ते १५ मिनिटेही फाटक खुले राहत नाही. त्यामुळे वाहन चालकांना फाटकावरच ताटकळत फाटक उघडण्याची वाट बघत उभे रहावे लागते. यात सर्वाधिक त्रास आजारी नागरिकांना होत आहे. गेल्या ६ वर्षापासून रेल्वेस्थानक आणि फाटक येथे उड्डाण पुलाची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष दिले नाही. अदाणीने रेल्वे स्थानक व रेल्वे लाईन तयार करून दिल्या, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकरिता खानावळी डब्याची पूर्ती करण्यात आली, पण प्रवाशांकरिता कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.
अदाणी कंपनीमुळे सर्वाधिक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. आपली गरज भागविण्याकरिता आणि रकमेची बचत करण्याकरिता रेल्वे विभागाला खुश करण्याकरिता विविध उपाय योजना केल्या गेल्या. मात्र प्रवाशांकरिता आवश्यक असणाऱ्या गरजांची कोणतिही उपाय योजना तयार करण्यात आली नाही. दोन वर्षापूर्वी पासून रेल्वे कर्मचाऱ्यांकरिता खानावळी व्यवस्था अदाणी कडून डब्याची व्यवस्था केली जात होती. या खर्चात एक ओव्हरब्रिज तयार करण्यात आला असता, याचा लाभ प्रवासी नागरिकांना झाला असता. मात्र तसे करण्यात आले नाही. परिणामी रेल्वे स्थानक व रेल्वे फाटकावर पुलाची मागणी आहे. (वार्ताहर)

स्वतंत्र रस्ता नाही
रेल्वे फाटकावर काचेवानी आणि बरबसपुरा कडून येणे-जाणे करणाऱ्या प्रवाशांकरिता स्वतंत्र रस्त्याची व्यवस्था नसल्याने प्रवासी रेल्वे रुळाच्या मध्य भागून ये-जा करतात. अशात मागून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांचा जीव नेहमी धोक्यात राहतो. रेल्वे प्रशासनाने तत्काळ कारवाई करून समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Older children at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.