मृतावस्थेत मिळाल्या नऊ गायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:24 IST2018-09-30T22:23:45+5:302018-09-30T22:24:17+5:30
शहरातील संत रविदास वॉर्डात शनिवारी (दि.२९) सकाळी नऊ गायी मृतावस्थेत मिळून आल्या. नगर परिषदेने गायींना उचलून मेंदीपूर येथील डंपींग ग्राउंडमध्ये खड्डा खोदून टाकले. मात्र गायी कुणी मारल्या याबाबत काहीच झाले नाही शिवाय पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला होता.

मृतावस्थेत मिळाल्या नऊ गायी
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शहरातील संत रविदास वॉर्डात शनिवारी (दि.२९) सकाळी नऊ गायी मृतावस्थेत मिळून आल्या. नगर परिषदेने गायींना उचलून मेंदीपूर येथील डंपींग ग्राउंडमध्ये खड्डा खोदून टाकले. मात्र गायी कुणी मारल्या याबाबत काहीच झाले नाही शिवाय पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (दि.२९) सकाळी संत रविदास वॉर्डात भागातील शेत व शाळेजवळ गायी मृतावस्थेत आढळल्या. याबाबत माहिती मिळताच नगर परिषदेने गायींना उचलून डंपींग ग्राऊंडमध्ये खड्ड्यात टाकले. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत गायी कशामुळे मरण पावल्या, त्यांना कुणी विष दिले काय किंवा आजाराने मरण पावल्या याची शहानिशा करण्यात आली नाही.
याबाबत पोलिसांत तक्रार देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरीय तपासणी करणे अपेक्षीत होते. शनिवारी सकाळी खड्ड्यात टाकल्यानंतरही खड्डा रविवारी सायंकाळपर्यंत उघडाच होता. या संदर्भातील फोटो सोशल मिडियावर वायरल होताच नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी पत्रपरिषद बोलाविली. यात त्यांनी नगर परिषदेने कुत्रा, डुकर, गायी व इतर कोणत्याही जनावरांना मारण्यासाठी मोहीम हाती घेतली नसल्याचे सांगीतले. तसेच मालेल्या गायींवर कुणीही मालकी हक्क न दाखविल्याने व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेत मृतदेह त्वरीत उचलण्यात आले.
रविवार सुटीचा दिवस असल्याने कामगार उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सोमवारी खड्डा बुजवून पोलिसांतही तक्रार देणार असल्याचे सांगीतले. गुरांचे मालक त्यांच्या पालनपोषणाचा खर्च वाचविण्यासाठी मोकाट सोडतात. अशात शेतात किटकनाशक टाकलेले विषारी पीक खाऊन देखील गुरांचा मृत्यू होता. मात्र मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यात नगर परिषद प्रशासन अपयशी ठरले असून यापुर्वीही गुरे मरण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे समाजविघातक शक्ती सामाजीक तेढ निर्माण करण्यासाठी गायींना विष तर देत नाही अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.