गरजूंसाठी धावले खालसा सेवा दल सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:18+5:30
सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे आज रूग्णालयात असलेल्या रूग्णांच्या नातेवाईक तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. मात्र या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलने घेतली असून दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरण करीत आहे. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांसोबतच शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रूग्णांच्या नातेवाईकांना खालसा सेवा दलकडून जेवण पुरविले जात आहे.
कोरोनाच्या कहरमुळे अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेले तसेच शहरातील भिकारी मात्र उघड्यावर आले आहेत.
सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.
याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिले जात आहेत. यातील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालय तसेच म्युनिसिपल शाळेतील भिकाºयांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलची विशेष गाडी जात आहे. तर अन्य रूग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहचवून देत आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे तसेच पॅकेट बनविण्यासाठी आजघडीला सुमारे ७०-८० महिला-पुरूषांची टीम सेवा देत आहे. यामुळे दररोज तीन हजार गरजूंना मदत होत आहे.
२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेत
येथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रूग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार मान यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुबीयांना सांगीतले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.
रुग्णांसह अनेकांना होतेय मदत
खालसा सेवा दलकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकावर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली असून दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये केटीएस, बीजीडब्ल्यूमधील सुमारे दोन हजार २०० जणांचा समावेश त्यांना गाडीने जेवण पोहचविले जात आहे. तर अन्य खासगी रूग्णालयातील सुमारे ८०० जणांना कार्यकर्ते दुचाकीने पॅकेट पोहचवित आहेत.