अजूनही अनेक वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; परिवहन विभागाची कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:04 IST2026-01-21T17:02:02+5:302026-01-21T17:04:57+5:30
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाहनधारकांचा मोठा वाटा आहे.

अजूनही अनेक वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; परिवहन विभागाची कडक कारवाई
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याबाबत महाराष्ट्र परिवहन विभाग आता कडक भूमिकेत आला आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ८२ हजार वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असताना, आतापर्यंत केवळ १ लाख १० हजार वाहनांवरच ही प्लेट बसवण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ७० हजार वाहनधारकांनी अजूनही नियमांचे पालन केलेले नाही, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाहनधारकांचा मोठा वाटा आहे. एचएसआरपी बसवण्यासाठीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. मात्र, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
सध्या राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे आतापर्यंत तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात ‘रडाळ वाहन’ अर्थात नवीन तपासणी/विशेष वाहन तपासणी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहनांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान नागरिकांना रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावावा, वेगमर्यादेचे पालन करावे तसेच इतर नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांनी तात्काळ नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.