अरण्यऋषी मारोती चितमपल्ली शेवटची इच्छा अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:10 IST2025-06-27T21:10:01+5:302025-06-27T21:10:55+5:30
माधवझरी ऐवजी नवेगावबांध जलाशयात अस्थी विसर्जन : वन विभागाची परवानगी न मिळाल्याची माहिती

अरण्यऋषी मारोती चितमपल्ली शेवटची इच्छा अपूर्णच
गोंदिया : नवेगावबांधला ओळख मिळवून देणारे प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ पदमश्री तथा अरण्यऋषी माराेती चितमपल्ली यांचे १८ जून रोजी सोलापूर येथे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या अस्थी गोंदिया जिल्ह्यातील माधवझरी येथील माधवराव पाटील डोंगरवार यांच्या समाधी स्थळाच्या अस्थी शेजारी विसावणार होत्या. मात्र वन विभागाची परवानगी न मिळाल्याने शुक्रवारी (दि.२७) त्यांच्या अस्थी नवेगावबांध येथील जलाशयात विसर्जीत करण्यात आल्या. यामुळे मात्र अरण्यऋषींची अंतिम इच्छा अपुर्णच राहिली.
पद्मश्री मारोती चितमपल्ली यांचे नवेगावबांधसह अनोखे नाते होते. त्यांनी वनाधिकारी म्हणून येथे जवळपास १२ वर्ष सेवा दिली. या काळात पवनीधाबे येथील त्यांचे गुरु माधवराव पाटील डोंगरवार यांच्याशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. माधवराव पाटील यांनी अरण्यऋषी मारोती चितमपल्ली यांना या जंगल परिसराची सखोल माहिती दिली. वन्यप्राण्यांना पाण्यांची चणचण भासू नये यासाठी माधवराव पाटील यांनी माधवझरी परिसर निर्माण केला. माधवराव पाटील यांचे निधन झाल्यानंतर याच परिसरात त्यांचा अंत्यविधी पार पडला होता. त्यामुळे मारोती चितमपल्ली यांनी सुध्दा याच परिसरात माझ्याही अस्थी पुरण्यात याव्या अशी इच्छा व्यक्त केली होती. १८ जून रोजी मारोती चितमपल्ली यांचे सोलापूर येथे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी विमानाने नागपूर येथे पाठविण्यात आल्या होत्या.
वर्धा येथील मारोती चितमपल्ली यांचे स्नेही कौशल्य मिश्रा हे या अस्थी घेवून नवेगावबांध येथील माधवझरी येथे येणार होते. पण काही अडचणीमुळे ते पाच सहा दिवस त्यासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.२७) दुपारी ३ वाजता कौशल्य मिश्रा व त्यांचे सहकारी पवनीधाबे येथे पोहचले. यानंतर त्यांनी माधवझरी येथे माराेती चितमपल्ली यांच्या अस्थी विसर्जनाची परवानगी वन विभागाकडे मागीतली. पण ती न मिळाल्याने सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या अस्थी नवेगावबांध येथील जलाशयात विसर्जीत करुन करुन कौशल मिश्रा हे व्यथीत होवून वर्धा येथे परतले. यामुळे मारोती चितमपल्ली यांची अंतिम इच्छा अपुर्णच राहिली. यासंदर्भात कौशल मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नसून व्यथीत असल्याचे सांगितले.
परवानगीसाठी दोन तास प्रयत्न
कौशल मिश्रा हे शुक्रवारी दुपारी मारोती चितमपल्ली यांचे अस्थी कलश घेवून गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी येथे नारायण पाटील डोंगरवार यांच्या घरी पोहचले. यानंतर चितमपल्ली यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी माधवझरी परिसरात विसवण्यासाठी वन व वन्यजीव विभागाची परवानगी मागीतली. हा परिसर संरक्षित क्षेत्रात येत असल्याने तब्बल दोन तास प्रयत्न करुन सुध्दा परवानगी न मिळाल्याने व्यथीत होवून अखेर कौशल मिश्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवेगावबांध जलाशयात अस्थी विसर्जीत केल्या.