प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:48+5:30
मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे.

प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील २-३ दिवस संततधार बरसलेल्या पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा सातत्याने वाढत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप अपेक्षेच्या तुलनेत पाऊस बरसलेला नसल्याने २५७ मीमी. पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची गरज आहे.
मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे. मात्र गुरूवारी (दि.१३) दुपारपासून पावसाने उघाड दिली आहे.
मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात ५२.३० टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ६९.१८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ४४.२४ टक्के तर कालीसरार प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली. शिवाय प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होत आहे. असे असताही मात्र अद्याप २५७ मीमी पावसाची तूट कायम आहे.
जिल्ह्यात १४ आॅगस्ट पर्यंत ८६९.६ सरासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र यंदा आतापर्यंत ६१२.८१ सरासरी पाऊस बरसलेला आहे.
पुजारीटोला प्रकल्पाची दारे उघडण्याची शक्यता
पाटबंधारे विभागातील नियमांनुसार १५ आॅगस्टपर्यंत प्रकल्पांत ७४ टक्के जलसाठा ठेवायचा असून त्यापेक्षा जास्त होत असल्याचे पाणी सोडावे लागते. त्यानुसार, पुजारीटोला प्रकल्पात १४ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत ६९.१८ टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली असून त्यात वाढ होत आहे. अशात पाऊस बरसल्यास जलसाठ्यात वाढ होणार असल्याने दार उघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
आणखीही दमदार पावसाची गरज
मागील ४-५ दिवसांत बरसलेल्या पावसामुळे आता कुठे जिल्ह्यात पाऊस बरसल्यासारखे वाटत आहे. सुरूवातीचे जून व जुलै हे २ महिने कोरडेच गेल्याने तेव्हापासूनच जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. आताही जिल्ह्यात पावसाची तूट कायम असून त्याची सरासरी २५७ एवढी आहे. आताही सरासरी भरून काढण्यासाठी जिल्ह्यात आणखीही दमदार पावसाची गरज दिसून येत आहे.