सामाजिक वनीकरणच्या परिश्रमातून बहरली वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:22+5:30
सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत डौलदार उभे आहेत. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत दररोज १२६ मजुरांना रोजगार दिला जात होता.

सामाजिक वनीकरणच्या परिश्रमातून बहरली वनराई
राजेश मुनिश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत तालुक्यात दोन लाख ८५ हजार वृक्ष लागवड करून उद्दिष्टपुर्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा व गावातील मोकळ्या जागेत झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. यामुळे भर उन्हाळ्यातही तालुक्यात लावलेली झाडे हिरवीगार बहरलेली दिसत आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत डौलदार उभे आहेत. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत दररोज १२६ मजुरांना रोजगार दिला जात होता. आता १०० मजूर काम करीत आहेत.
लावलेल्या झाडांची उंची ५-६ फूट झाली असून ९० टक्के संगोपन झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरीक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, वनरक्षक विनोद राऊत, कर्मचारी उत्तम संतोषवार आदिंनी परिश्रम घेतले आहे. तालुक्यातील कोकणा, खोबा, बोपाबोडी, श्रीरामनगर, माहुली, मनिकघाट येथे लागवड केलेली झाडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यासाठी लोकांचे सहकार्य लाभल्याने ही योजना यशस्वी ठरली. लागवड केलेली सर्वच झाडे १०० टक्के जिवंत राहतील याचा प्रयत्न आमचे कर्मचारी नेहमी करतात.
-अनंत तारसेकर
उपविभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण गोंदिया
...........................................
सामाजिक वनीकरण विभागाला मिळालेले उद्दीष्ट लोकांच्या सहकार्यातून पूर्ण केले आहे. रोपांचे संगोपन करून ते टिकविण्यासाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळाले. सडक-अर्जुनी तालुक्यातील चार कामांना तीन वर्ष पूर्ण झाल्याने ते संबंधित विभागाला सोपविले आहेत.
-अविनाश मेश्राम, वन परिक्षेत्र अधिकारी
सामाजिक वनीकरण, सडक अर्जुनी