अवकाळीमुळे टरबूज उत्पादकांवर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:26+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात.
राजेश मुनीश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : मागील महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने याचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे टरबूज, डांगरू उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा याचा फटका सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मालाची वाहतूक होत नसल्याने बºयाच प्रमाणात माल जागेवरच सडत असल्याने टरबूज उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात. त्यामुळे तीन महिन्याचा कालावधी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.मात्र यंदा सातत्याने येणाऱ्या अवकाळी पावसामुळे टरबूज उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. गारपीट आणि पावसामुळे टरबूज खराब होत असल्याने त्यांची विक्री न करता ते तसेच फेकून देण्याची वेळ टरबूज उत्पादक शेतकºयांवर आली आली आहे.
सिंदीपार येथील ओंकार लजे, जोशीराम लंजे, चंदू लंजे, सेवकराम लंजे, सुरेश गहाणे, केवळराम लजे, कैलाश लंजे, आदी शेतकºयांनी २२५ एकरात टरबूज पिकाची लागवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावीत असल्यामुळे टरबूज व डांगरू पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. फळ बरोबर आले नाही, काही प्रमाणात फळ आले तर फळांना मागणी नसल्याने हाती आलेले पीक शेतात तसेच पडून आहे.
सध्या कोरोनाचा प्रकोप वाढल्याने, लॉकडाऊन असल्यामुळे कुणीही घरा बाहेर पडत नसल्याने टरबुजाची मागणी कमी झाली आहे. परिणामी या शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च निघणे सुध्दा कठीण आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार गावात २२५ एकर शेतीत टरबूज व डांगरू पिकाची लागवड केली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. टरबूज उत्पादक शेतकºयांनी स्थिती पाहता त्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या वर्षी माझ्या शेतात खर्च वजा करता निवळ नफा चार लाख रूपये मिळाला होता.पण यावर्षी नफा मिळणे कठीण असून केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे.
- चंदू लंजे, शेतकरी सिंदीपार
मी माझ्या सात एकरात डांगरू पिकाची लागवड केली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे डांगराच्या वेलावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने फळ बरोबर आले नाही.कोरोनामुळे डांगरांना मागणी नसल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे.
- ओंकार लंजे, शेतकरी