पेन्शनसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:57 IST2018-09-28T23:56:46+5:302018-09-28T23:57:41+5:30
अनेक वेळा मोर्चे आंदोलन, महामुंडन करुनही बधीर झालेल्या शासनाला जागे करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे पेन्शन दिंडी आयोजित करण्यात आली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातून २७०० कर्मचारी सहभागी होणार आहेत.

पेन्शनसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी एकवटले
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : अनेक वेळा मोर्चे आंदोलन, महामुंडन करुनही बधीर झालेल्या शासनाला जागे करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे पेन्शन दिंडी आयोजित करण्यात आली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातून २७०० कर्मचारी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे कर्मचाऱ्यांच्या विश्वासघात करीत त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मोडीत काढून श्ोअर मार्केटवर विसंबून असलेली अंशदायी पेन्शन योजना लादण्यात आली आहे. सदर पेन्शन योजनेमुळे एखादा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास व सेवानिवृत्त झाल्यास त्याला केवळ नाममात्र पेशंन स्वरुपात मदत मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन हक्काच्या बाबीवर गदा येत आहे. या विरोधात कर्मचाऱ्यांनी शासना विरोधात पेन्शन दिंडीचे आयोजन केले आहे. पेन्शन दिंडीत सहभागी होण्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील कर्मचारी ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबरला मुंबईला रवाना होणार आहेत.
याकरिता कर्मचाऱ्यांनी प्रती कर्मचारी २०० रुपये लढा निधी गोळा केला आहे. विशेष म्हणजे पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची बाब असून शासनाने त्याकडे लक्ष देवून कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू करावी. यासाठी २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांनीही पेन्शन दिंडीत सहभाग नोंदविला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन दिंडीत सहभागी व्हावे असे गोंदिया जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आशिष रामटेके, सचिन राठोड, प्रवीण सरगर, जितू गणवीर, संदीप सोमवंशी, लिकेश हिरापुरे, महेंद्र चव्हाण, सुभाष सोनवाने, शीतल कनपटे, राज कडव, सचिन धोपेकर, जीवन म्हशाखेत्री, सुनील चौरागडे, संतोष रहांगडाले यांनी कळविले आहे.
राज्यातून लाखावर कर्मचाऱ्यांचा सहभाग
२ आॅक्टोबरपासून ठाणे ते मुंबई येथे आयोजित पेन्शन दिंडीत राज्यातून एक लाखापेक्षा अधिक कर्मचारी सहभागी होणार आहे. लाखावर कर्मचारी २ आॅक्टोबरला पेन्शन दिंडीत सहभागी होणार आहे. त्यानंतर ३ आॅक्टोबरला संघटनेतर्फे मंत्रालयाला घेराव घालण्यात येणार आहे. यानंतरही कुठेलच पाऊल न उचलल्यास राज्यातील सुमारे १२८६ कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत.