राजनडोंगरी जंगलातील वृक्ष कटाई बंद करा
By Admin | Updated: November 22, 2014 23:05 IST2014-11-22T23:05:13+5:302014-11-22T23:05:13+5:30
वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ सालई हलका गट क्रमांकाच्या जागेवरील ६६.५० हेक्टर पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपूर्ण कटाई करण्याची शासनाकडून

राजनडोंगरी जंगलातील वृक्ष कटाई बंद करा
देवरी : वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ सालई हलका गट क्रमांकाच्या जागेवरील ६६.५० हेक्टर पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपूर्ण कटाई करण्याची शासनाकडून परवानगी घेऊन सदर जंगल कटाईला मागील १४ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली. मात्र या जंगल कटाईला राजनडोंगरी जंगल परिसरातील ९० टक्के आदिवासी लोकांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीकोणातून बंद पाडले आहे.
या राजनडोंगरी गावातील आदिवासी लोकांच्या मते सन १९९० पासून सदर जंगल वनविभागाने वनविकास महामंडळाला सुपूर्द केले. तेव्हापासून या जंगलात दोन वेळा वनिकरणाच्या विविध योजनेंतर्गत या जंगलाची चापल कटाई करून या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन झाडे लावण्यात आली होती. आता यावेळी सुद्धा संपुर्ण जंगलात चापल कटाई करण्याचा सपाटा १४ नोव्हेंबरपासून वनविकास विभागाने लावला आहे. त्यानुसार राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ मधील ६६.५० हेक्टर जागा पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपुर्ण चापल कटाई करण्याची शासनाकडून परवानगी घेऊन येथील वनविकास विभागाकडून सदर जंगल कटाईला मागील १४ नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.
सदर गावातील झाडाची कटाई गावातील आदिवासी लोकांच्या पुढाकाराने पर्यावरणाच्या रक्षणाकरिता बंद पाडण्यात आली आहे. या गावच्या लोकांच्या मते सदर जंगल कटाई करण्याकरीता ग्रा.पं. नकटी किंवा वन हक्क समिती पदाधिकाऱ्यांना विचारपुस करुन परवानगी घेतली नाही. तसेच यांचे म्हणणे ऐकले नाही. तसेच या जंगलात वनिकरण केल्यानंतर आमच्या घरची गुरे-ढोरे चरायला कुठे नेणार? आमच्या गावच्या लोकांना ईमारतीसाठी लाकडे लागल्यावर आणायची कुठून असा प्रश्न उपस्थित केला. जर या जंगलात वनिकरण करायचे असेल तर खुल्या जागेवर करावे. आम्ही फक्त झाडे तोडण्यास व कटाई करण्यास मनाई करीत आहो. केंद्र सरकार व राज्य सरकार पर्यावरणाच्या संरक्षणाकरीता विविध योजने द्वारे झाडे लावा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करा असे म्हणते. तर जीवंत मोठी झाडे कापून त्या जागेवर वनिकरन करा असे सांगत नाही. परंतु वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी असे कृत्य कशासाठी करीत आहेत हे कळत नाही.
आता या जंगलातील सागवन जातीचे दोन झाड, ककईचे तीन, बिजाचे तीन, मोवईचे दोन, गराडीचे सात, सिहनाचे दोन, भेराचे तीन आणि धावडा जातीचे एक अशी २३ झाडे कापून बीट तयार करण्यात आले आहे. याबाबद राजनडोंगरीवासीयांनी ग्रा.पं. नकटी, वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले आहे.