शहरात उरले ५० ‘स्टँडपोस्ट’
By Admin | Updated: May 9, 2015 01:28 IST2015-05-09T01:28:36+5:302015-05-09T01:28:36+5:30
‘आमदनी अठन्नी, खर्चा रूपय्या’ अशी येथील नगरपरिषदेची स्थिती आहे. त्यात पाणी पुवरठ्यावर होणारा नाहक आर्थिक खर्च.

शहरात उरले ५० ‘स्टँडपोस्ट’
गोंदिया : ‘आमदनी अठन्नी, खर्चा रूपय्या’ अशी येथील नगरपरिषदेची स्थिती आहे. त्यात पाणी पुवरठ्यावर होणारा नाहक आर्थिक खर्च. यामुळे त्रस्त झालेल्या नगरपरिषद प्रशासनाने शहरात पूर्वी असलेल्या ९० ‘स्टँडपोस्ट’ पैकी ४० कमी करविले असून त्यामुळे आजघडीला शहरात पालिकेचे फक्त ५० ‘स्टँडपोस्ट’ उरले आहेत. या ‘स्टँडपोस्ट’च्या माध्यमातूनच आता शहरात गरजवंत नागरिक पाण्याची समस्या सोडवून घेत आहेत.
पाणी ही मुलभूत गरजच नसून पाणी हेच जीवन आहे. एकदा खायला मिळाले नाही तर चालेल, मात्र पाण्या शिवाय होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला पाणी पुरवठा करणे ही शासनासाठी बंधनकारक आहे. शहरातील प्रत्येकाचीच खाजगी नळ कनेक्शन घेण्याची आर्थिक स्थिती नाही. अशात त्यांना पाणी पुरवठा करता यावा यासाठी ‘स्टँडपोस्ट’द्वारे पाणी पुरवठा केला जातो. यानुसार नगरपरिषदेने शहरातील प्रत्येक भागात ‘स्टँडपोस्ट’ बसविले होते.
मात्र ‘स्टँडपोस्ट’ वरून पाण्याचा उपयोग कमी व नासाडा जास्त होतो. शिवाय ‘स्टँडपोस्ट’वर असलेले नळ नागरिकांकडून चोरून नेले जातात. त्यामुळे पिण्याचा शुद्ध पाणी डोळ््यादेखत वाहत असते. नागरिकांच्या सुविधेसाठी हे ‘स्टँडपोस्ट’ असतात. मात्र खिशातून खर्च करावा लागत नसल्याने नागरिक त्यांची मोडतोड करतात. याचा भुर्दंड मात्र पालिकेने बसत होता.
सन २०१२ पर्यंत शहरात पालिकेचे ९० ‘स्टँडपोस्ट’ होते. यासाठी पालिकेला दरमहा सुमारे अडीच लाखांचे बील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे भरावे लागत होते. अगोदरच विविध आर्थीक समस्यांनी ग्रस्त असलेल्या नगरपरिषदेला हा खर्च न परवडणारा होता. त्यात ‘स्टँडपोस्ट’ चा योग्य वापर होत नव्हता. त्यामुळे पालिकेने सन २०१३ मध्ये २० ‘स्टँडपोस्ट’ महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून बंद करविले. तर त्यानंतरही २० ‘स्टँडपोस्ट’ बंद पडून होते व त्यातून पाणी पुरवठा होत नसल्याने त्यांनाही बंद केले. (शहर प्रतिनिधी)
पालिकेवर होती १७ लाखांची थकबाकी
पालिकेने शहरात बसविलेल्या‘स्टँडपोस्ट’ चे बील पालिकेला वहन करावे लागत होते. त्यामुळे पालिकेले ९० ‘स्टँडपोस्ट’ साठी दरमहा सुमारे अडीच लाख रूपयांचे बील भरावे लागत होते. मात्र मधात बील भरण्यात अनियमीतता आल्याने पालिकेवर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणची ‘स्टँडपोस्ट’ बीलाची थकबाकी वाढत गेली. ही थकबाकी १६ लाख ५८ हजार ५७७ रूपयांपर्यंत पोहचली होती. दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने वसुली मोहीम हाती घेतली असता पालिकेने मार्च महिन्यात थकीत रक्कम भरली.
नागरिकांच्या सहकार्याची गरज
‘स्टँडपोस्ट’ म्हणजेच ‘सार्वजनिक नळ खांब’ हे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी असतात. ‘स्टँडपोस्ट’च्या माध्यमातून नागरिकांना पालिकेने करवून दिलेली ही एक सुविधा आहे. यासाठी नागरिकांना जरी खर्च येत नसला तरी पालिकेला त्याबद्दल लाखो रूपयांचे बील भरावे लागते. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेताना त्यावर अतिरेक करू नये. मात्र नागरिक ‘स्टँडपोस्ट’वरील नळ चोरून नेतात. नळांना खराब करतात, नळ उघडेच सोडून देतात. यात पाण्याचा नासाडा होतो. पिण्याचे शुद्ध पाणी यातून नाहक वाहून जाते. त्यामुळे नागरिकांनी ही आपली नैतीक जबाबदारी समजून नळ चोरून नेवू नयेत. पाणी भरल्यावर नळ व्यवस्थीत बंद करावे. कधी नळ बदलण्याची गरज पडलीच तर ते बदण्याचीही तयारी ठेवायला हवी. कारण ही आपल्यासाठीच करण्यात आलेली सोय आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.