गोविंद गावडेंमुळे 'एसटी' भाजपपासून दूर जाणार? सभेनंतर राजकीय चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:57 IST2025-06-24T12:56:08+5:302025-06-24T12:57:26+5:30
गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढल्यानंतर फोंड्यात 'एसटी' दुखावल्याची भावना

गोविंद गावडेंमुळे 'एसटी' भाजपपासून दूर जाणार? सभेनंतर राजकीय चर्चेला उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : प्रियोळचे आमदार व माजी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी माशेल येथे रविवारी (दि. २२) सभेत अप्रत्यक्ष राजकीय एल्गार पुकारला आहे. एका बाजूने त्यांनी थेट सांगितले आहे की, आपण भाजप सोडणार नाही, तर दुसऱ्या बाजूने नेतृत्वालाच त्यांनी भाजपच्या आव्हान दिले. त्यांनी तालुक्यातील आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन हे धाडस केले असावे. घाईगडबडीत निर्णय घेणाऱ्यांपैकी ते नाहीत, अन्यथा त्यांनी ज्या दिवशी उटा संघटनेने फर्मागुडी येथे मेळावा घेतला होता, त्याच दिवशी शड्डू ठोकला असता.
खांडोळा-माशेल येथील सभा घेण्याअगोदर गावडे यांनी आपल्या चळवळी स्वभावातून व आपल्या शिलेदारांच्या साथीने काहीतरी मनात पक्के केले असणार. कदाचित, त्यांनी राज्यातील आदिवासी बांधवांकडे थेट संपर्क साधून आपली बाजू आदिवासी नेत्यापर्यंत भक्कमपणे मांडली असणार. म्हणूनच ते अप्रत्यक्षपणे राजकीय एल्गार करण्याच्या भूमिकेत पोहोचले आहे. या सभेत गावडे यांनी आपण भाजपसोबतच असल्याचे जाहीर केले तरीही मंत्री पदावरून काढल्याने त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती.
फोंडा तालुक्यातील सर्वच एसटी समाज बांधव गोविंद गावडे यांच्यासोबत नाहीत, पण प्रियोळ मतदारसंघ आणि आपसपासच्या भागातील एसटी युवक निश्चितच गोविंद गावडे यांच्या सोबत आहेत. त्यामुळेच भाजप आतापासूनच गावडे यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असेल.
तालुक्यातील एसटीची ३५ हजार मते
फोंडा तालुक्याचा विचार करता गावडे यांना दुखावणे भाजपला खरेच परवडू शकेल का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कारण, सध्या तालुक्यातील चार मतदारसंघात किमान ३५ हजार मतदार आदिवासी समाजातील, त्यातील सर्वाधिक सुमारे १२ हजार मतदार प्रियोळ मतदारसंघात येतात. जर गावडे व त्यांच्याबरोबर आदिवासी समाजातील इतर नेते दुखावले गेले असतील तर या १२ हजारपैकी किती मतदार गावडे यांना आगामी निवडणुकीत साथ देतील यावरच त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे ती १०० टक्के मते आपल्या पारड्यात घेण्यासाठी गावडे यांना आतापासूनच व्यूहरचना करावी लागेल. जर भाजपने प्रियोळ मतदारसंघात आदिवासी समाजामधीलच एक प्रभावशाली व्यक्ती उमेदवार म्हणून पुढे केली तर त्यावेळी मात्र सर्व समीकरणे जुळवून घ्यावी लागतील. यावरून सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे. समाजामधीलच एका ज्येष्ठ डॉक्टरांना पुढे करण्याचे प्रयत्न होत आहेत. यात किती तथ्य आहे, हे निवडणुकीला सहा महिने असताना समोर येईल.
मडकई मतदारसंघात एसटी समाजाची सात हजार मते
फोंडा मतदारसंघाचा विचार करता तेथे आदिवासी समाजाची तीन ते साडेतीन हजार मतदार आहेत. मागच्या वेळी यातील बहुतांश लोकांनी आरजी पक्षाच्या पारड्यात मते टाकली होती. उर्वरित मते विभागून गेली होती. आता यातील कितीजण दुखावले आहे, हे सध्याच्या घडीला कळणे कठीण आहे. मडकई मतदारसंघात आदिवासी समाजाची प्रियोळनंतरची सर्वाधिक मते आहेत. येथे सहा ते सात हजार एसटी समाजाची मते आहेत. येथे मगो पक्षाचे आमदार आहेत. मगोला मत द्या, असे गावडे यांच्याकडून सांगणे अशक्य आहे. गत विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाच्या प्रेमानंद गावडे यांनी या मतदारसंघातून तब्बल साडेतीन हजार मते मिळवली होती. त्यातील बहुतांश मते एसटी समाजाची होती. प्रेमानंद गावडे यांनी अजूनही तेथे काम चालूच ठेवले आहे. शिरोडा मतदारसंघातही पाच ते सहा हजारच्या दरम्यान एसटी समाजाची मते आहेत. शिरोडातील पोटनिवडणुकीत आपण काम केल्यामुळेच भाजपचा विजय झाला होता, असा दावा खांडोळा येथील सभेत आमदार गावडे यांनी केला होता.
आमदार गोविंद गावडे हे आजच्या घडीला एसटी समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. समाजातील युवकांमध्ये त्यांनी नवचेतना जागवलेली आहे. त्यांच्या प्रत्येक सभेला मोठी गर्दी असते. त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न भाजपने कदापि करू नये. कारण गावडे यांचा सन्मान जसा समस्त एसटी बांधवांचा सन्मान आहे, तसाच त्यांचा अपमान हा समस्त एसटी समाजबांधवांचा अपमान आहे. भाजपने गावडे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास एसटी समाजाची मते भाजपला मिळणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे.
विश्वास गावडे, कार्यकारी अध्यक्ष उटा
गोविंद गावडे यांच्याबरोबर आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत, हे विधान चुकीचे आहे. समाजातील ज्येष्ठ नेते आजही गौड मराठा समाजाच्या झेंड्याखाली काम करतात. श्रीकांत पालसरकरसारख्या युवकाने उटाची मुहूर्तमेढ रोवली होती. एसटी समाजातील युवकांना एकत्र आणण्याचे काम मी व पालसरकर यांनी केले होते. रमेश तवडकरांचा हात धरून गोविंद गावडे व्यासपीठावर चढले होते. त्या गोष्टीचा आज आम्हाला पश्चाताप होत आहे. नंतर उटा भलत्यानीच हायजॅक केलेली आहे. मात्र हे करण्यामागे सूत्रधार कोण आहे हे सर्व एसटी बांधवांना माहीत आहे. कोणीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी एसटी समाजाचा वापर करू नये. मत कोणाला द्यावे हे समजण्याएवढा एसटी समाज सज्ञान आहे. आजपर्यंत गावडे यांनी समाजाची कशी दिशाभूल केली आहे हे जाहीर व्यासपीठावर सांगायलाही मी तयार आहे. - दिनेश जल्मी, सल्लागार, गोमंतक गोड मराठा समाज