योग्यवेळी सर्वांच्या फाइल्स काढणार: केतन भाटीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:19 IST2026-03-04T12:19:09+5:302026-03-04T12:19:35+5:30
गैरकृत्य करणाऱ्यांना वेळीच सावध राहण्याचा दिला इशारा

योग्यवेळी सर्वांच्या फाइल्स काढणार: केतन भाटीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राजकारण करत असताना काही मर्यादा पाळाव्या लागतात. आजपर्यंत मर्यादेच्या मी चौकटीत राहूनच राजकारण केले आहे. कधीच कुणावर खोटे व नाहक आरोप केले नाहीत. मात्र जे आज माझ्यावर खोटे आरोप करत आहेत त्या सगळ्यांच्या फाइल्स वेळेवर बाहेर काढल्या जातील. जे गैरकृत्य करण्यात माहीर आहेत त्यांनी वेळीच सावध व्हावे, असा इशारा फोंड्यातील काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांनी दिला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन करत ते म्हणाले, मुख्यमंत्री परत परत फोंड्यात येतात या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे व राहणार. मागच्या चार वर्षांत मुख्यमंत्री फोंड्यात किती वेळा आले याचा सर्वांनी विचार करावा. मात्र पोटनिवडणूक आल्यानंतरच ते निरंतरपणे फोंड्यात येत आहेत. पूर्वीसुद्धा फोंड्यातील लोकांचे कामे होतीच; मग त्यावेळी त्यांना यावे असे का वाटले नाही, असे भाटीकर यांनी सांगितले.
स्व. रवि नाईक यांच्याबरोबर माझी मतभेद असतील तसेच वैचारिक लढाई होती. मात्र आमच्या दोघांमध्ये मनभेद कधीच नव्हते. म्हणूनच मी माझ्या कार्यक्रमांचे आमंत्रण घेऊन त्यांच्याकडे व्यक्तीशः गेलो आहे. खरे तर त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या पाठीत खंजर खुपसण्याचे काम केले, असे भाटीकर म्हणाले.
फोंड्यातील भाजपमध्ये जे काही तथाकथित भावी उमेदवार आहेत त्यांनी माझी आत्तापासूनच धास्ती घेतली आहे. कारण मी लोकांमध्ये राहून लोकांची कामे करत आहे. जनता सर्व काही पाहत आहे. आगामी पोटनिवडणुकीत लोक योग्य तो निर्णय निश्चित घेतील, असे त्यांनी सांगितले.
'त्या' फाइलचा शोध घ्यावा
एका गहाळ झालेल्या फाइलचा मुद्दा घेत ते म्हणाले की, आज भाजपचे नगरसेवक व पंच सदस्य आहेत त्यांनी त्या फाइलचा शोध लावावा. जेणेकरून स्व. रवि नाईक यांना खरी आदरांजली प्राप्त होईल. एका सार्वजनिक कामाच्या वेळी रवि नाईक यांनी ती फाइल गहाळ झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गहाळ फाइल मुळेच विकासकामांना खो बसतो असेही त्यांनी म्हटले होते. या लोकप्रतिनिधींनी राजकारण करायच्या ऐवजी त्या फाइलचा शोध घ्यावा, असे भाटीकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा मला पूर्ण अधिकार
खरे तर माझ्यावर आरोप करणाऱ्या भाजपच्या लोकांनी माझे आभार मानायला हवेत. कारण मी आवाज काढला म्हणून आज योजनेच्या लाभार्थीना चार महिन्यांपासून थकलेले पैसे मिळणार आहेत. पत्रकार परिषदेत भाजपचे काही लोक म्हणतात की, मी माझी कामे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेतली. आजपर्यंत माझे वैयक्तिक काम घेऊन मी कधीच मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा इतर मंत्र्यांपर्यंत गेलो नाही. मी लोकांची कामे व विकासकामासंदर्भात प्रस्ताव घेऊनच मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. ते फक्त भाजपचे मुख्यमंत्री आहेत असे जर इथल्या लोकांना वाटत असेल तर त्यांनी ते पण सांगावे.