“जीवन म्हणजे काय, भूक काय असते हे जेव्हा कळले तेव्हा आयुष्याचा मार्ग बदलला”: डॉ. प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:30 IST2025-06-06T07:28:38+5:302025-06-06T07:30:09+5:30

डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडला 'हेमलकसा'चा थक्क करणारा प्रवास

when realised what life is and what hunger is my life changed said dr prakash amte in goa event | “जीवन म्हणजे काय, भूक काय असते हे जेव्हा कळले तेव्हा आयुष्याचा मार्ग बदलला”: डॉ. प्रकाश आमटे

“जीवन म्हणजे काय, भूक काय असते हे जेव्हा कळले तेव्हा आयुष्याचा मार्ग बदलला”: डॉ. प्रकाश आमटे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : समाजसेवेचे बाळकडू आम्हाला बाबांकडून मिळाले. मी जेव्हा हेमलकसा येथे गेलो तेव्हा जीवन म्हणजे काय, भूक काय असते याची प्रचिती आल्याचा अनुभव समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी काल पर्यावरण दिन कार्यक्रमात मांडला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी डॉ. मंदाकिनी आमटेही उपस्थिती होत्या.

शाळेत असताना बाबांनी सहलीसाठी आम्हाला आदिवासी भागात नेले होते, तिथे त्यांची परिस्थिती पाहून मन हेलावले आणि तेव्हाच ठरवले की मला या लोकांसाठी काही तरी करायचे आहे. त्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर मी हेमलकसा येथे जाऊन सेवा करण्याचे ठरवले. लग्नानंतर मला दिलेल्या शब्दापोटी माझी बायको मंदाकिनी देखील माझ्यासोबत आली. अपार कष्ट तिनेही घेतले, म्हणून ही सेवा करणे शक्य झाल्याचे उद्‌गार आमटे यांनी काढले.

तेथील आदिवासी लोकांनी कपडे घातलेली माणसे कधी पहिलीच नव्हती, त्यामुळे आमचे स्वागत तिथे चांगले झाले नाही. पण आम्ही हार नाही मानली. तेथील बिकट स्थिती सुधारण्याचे ठरविले आणि आजही आमचे कार्य सुरू आहे. चौथ्या पिढीने हे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या गरजा कमी करून दुसऱ्याचे दुःख अनुभवल्यास आयुष्याचे खरे गणित कळेल, असेही डॉ. आमटे म्हणाले.

आमची सून गोव्याची, तीही आदिवासींचीच सेवा करतेय

गोव्याशी आमचे कौटुंबिक नाते आहे. आमची एक सून ही गोव्यातील आहे. के. डी साधले यांची ती मुलगी आहे. ती डॉक्टर असून, आता माझ्या मुलासोबत ती देखील आदिवासी भागात जाऊन सेवा देते. हेमलकसामध्ये जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा महिलांना अनेक आरोग्याच्या समस्या होत्या. ही स्थिती सुधारण्यावर आम्ही भर दिला. आता आमची गोव्याची सून स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने काम सोपे झाले, असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.

अन्नाचे आमिष दिले अन्...

चांगले जीवन जगायचे असेल तर आपल्या गरजा कमी ठेवणे, दुसऱ्यांचे दुःख जाणून घेणे आणि अपेक्षा कमी ठेवणे या गोष्टी केल्या पाहिजेत. जनावरांना प्रेमाने वाढवले तर ते कुठलीच इजा करत नाहीत, हे मी जिवंत आहे यावरूनच समजून घ्या. भुकेपोटी आदिवासी लोक मुक्या प्राण्यांना मारायचे, हे पाहून मी त्यांना सांगितले की तुम्ही जर प्राण्यांना माझ्याकडे आणून दिले तर मी त्यांना अन्न पुरवेन. या अन्नाच्या आमिषाने त्यांनी वाघ, बिबटे, साप, अस्वल यासारखे हिंस्र प्राणी माझ्याकडे आणले. ज्यांचा मी सांभाळ केला, असेही डॉ. आमटे यांनी सांगितले.

आदिवासींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत ते जीवन जगू शकतात. ते उद्याचा कधीच विचार करत नाहीत, आज आपण कसे जगू याच प्रयत्नात त्यांचा दिवस जातो. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड सहनशीलता आहे. आमच्याकडे उपचार करताना पूर्वी एनेसथेसिया नसायचा, तेव्हा आम्ही थेट घाव्यांवर टाके घालायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कुठलीच दुःखाची भावना दाखवली नाही. एका रुग्णाला तर मी १०० टाके घातले, तरी त्यांनी ते सहन केले. - डॉ. प्रकाश आमटे

Web Title: when realised what life is and what hunger is my life changed said dr prakash amte in goa event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.