रितेश नाईकांना उमेदवारी दिली, मग मला तिकीट का दिले नाही?; उत्पल पर्रीकरांचा भाजपला थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 06:49 IST2026-04-10T06:49:52+5:302026-04-10T06:49:52+5:30
रितेश नाईक यांना उमेदवारी देणे हे दिवंगत नेते रवी नाईक यांना श्रद्धांजली असल्याचे म्हटले जात आहे. मग भाजपने हाच निकष मनोहर पर्रीकर यांच्याबाबतीत का लावला नाही?

रितेश नाईकांना उमेदवारी दिली, मग मला तिकीट का दिले नाही?; उत्पल पर्रीकरांचा भाजपला थेट सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'भाजपकडून रितेश नाईक यांना उमेदवारी देणे हे दिवंगत नेते रवी नाईक यांना श्रद्धांजली असल्याचे म्हटले जात आहे. मग भाजपने हाच निकष मनोहर पर्रीकर यांच्याबाबतीत का लावला नाही', असा थेट सवाल उत्पल पर्रीकर यांनी केला. गुरुवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उत्पल यांनी भाजपच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उत्पल पर्रीकर म्हणाले की, 'या सर्व घडामोडींचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. त्यात पडण्याची माझी इच्छा नाही. हा भाजपचा अंतर्गत निर्णय असावा. मात्र, सध्याचा भाजप हा दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या विचारधारेवर चालत असल्याचे कुठेही जाणवत नाही. मला भाजपची काही धोरणे पटत नाही आणि त्यामुळे मी सध्या पक्षाबाहेर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींविषयी मी समाधानी नाही.'
उत्पल म्हणाले की, भाजपची पूर्वीची कार्यपद्धती आणि नेतृत्वशैली आता बदलल्याचेही दिसते. मनोहर पर्रीकर यांच्या काळातील पारदर्शकता, साधेपणा आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया आता दिसून येत नाही.