लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये सध्या दीड महिना पुरेल इतका जलसाठा उपलब्ध असून, पाणीटंचाईची कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या चिंतेवर त्यांनी अधिकृतपणे पडदा टाकला आहे.
मंत्री शिरोडकर यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होते. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असून, साळावली, पंचवाडी, अंजुणे यांसह विविध धरणांमधील पाण्याची पातळी मागील दोन वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी मिळणार नाही, हा समज चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याचा जलसाठा ३१ मेपर्यंत आणि त्यानंतरही सुमारे १५ दिवस म्हणजेच एकूण दीड महिना पुरेल इतका आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तरीदेखील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
राज्यात सध्या पाणीपुरवठा सुरळीत असला तरी उन्हाळ्याच्या काळात पाण्याचा वापर मर्यादित ठेवणे अत्यावश्यक आहे. अनावश्यक पाणी वापर टाळणे, गळती दुरुस्त करणे, तसेच घरगुती पातळीवर पाणी साठवण आणि पुनर्वापर यावर भर देणे गरजेचे आहे. भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे जलस्त्रोत खात्याने स्पष्ट केले आहे.
जलस्त्रोत खात्याच्या धरण पातळी निरीक्षण प्रणालीद्वारे दोन दिवसांपूर्वी नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याचे दिसून येते. काही धरणांमध्ये पाण्याची पातळी ४० टक्क्यांपेक्षा अधिक असून, एकूण स्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होते.
Web Summary : Goa's dams have sufficient water for 1.5 months, assuring no water scarcity. Minister urges responsible water usage despite adequate levels in reservoirs like Salauli and Anjunem. Citizens are encouraged to avoid waste and repair leaks to maintain supply.
Web Summary : गोवा के बांधों में 1.5 महीने के लिए पर्याप्त पानी है, जिससे पानी की कमी की कोई चिंता नहीं है। मंत्री ने सालाउली और अंजुने जैसे जलाशयों में पर्याप्त स्तर के बावजूद पानी के जिम्मेदार उपयोग का आग्रह किया। नागरिकों को आपूर्ति बनाए रखने के लिए बर्बादी से बचने और रिसाव की मरम्मत करने के लिए प्रोत्साहित किया जाता है।