नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी सत्ता हाती घेताच भारतासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. २७ मार्च रोजी पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यापासून गेल्या ४५ दिवसांत बालेन शाह यांनी एकापाठोपाठ एक असे ४ निर्णय घेतले आहेत, जे थेट भारताच्या हिताला बाधा आणणारे मानले जात आहेत. काठमांडूचे महापौर असताना 'आदिपुरुष' चित्रपटाला विरोध करणारे आणि 'ग्रेटर नेपाळ'चा नकाशा शेअर करणारे बालेन शाह आता पंतप्रधान म्हणून भारतासाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.
भारतीय परराष्ट्र सचिवांना भेटण्यास नकार
मुत्सद्देगिरीच्या इतिहासात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी घटना नुकतीच घडली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे नेपाळ दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे हा होता. मात्र, बालेन शाह यांनी मिस्री यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. "मी फक्त माझ्या समकक्ष (पंतप्रधान) पदाच्या व्यक्तीशीच चर्चा करेन," अशी ताठर भूमिका शाह यांनी घेतल्याने विक्रम मिस्री यांचा नेपाळ दौरा रद्द करावा लागला.
लिपुलेख-कालापानी वादाची पुनरावृत्ती
केपी शर्मा ओली यांच्या काळात गाजलेला कालापानी आणि लिपुलेख सीमावाद बालेन शाह यांनी पुन्हा एकदा उकरून काढला आहे. मानसरोवर यात्रेवरून चीनने जारी केलेल्या ॲडव्हायझरीचा संदर्भ देत शाह यांनी या भागावर नेपाळचा दावा ठोकला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कडक भाषेत प्रतिक्रिया दिली असून, हा मुद्दामहून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
गरिबांच्या पोटावर पाय; १०० रुपयांवर 'कस्टम ड्यूटी'
भारत-नेपाळ सीमेवरील तराई भागात राहणारे नेपाळी नागरिक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी भारतीय बाजारपेठांवर अवलंबून असतात. मात्र, बालेन सरकारने आता एक जाचक नियम लागू केला आहे. जर भारतीय सीमेवरून १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सामान नेपाळमध्ये नेले, तर त्यावर 'कस्टम ड्यूटी' भरावी लागणार आहे. यामुळे सीमावर्ती भागातील सामान्य नेपाळी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सीमेवर 'ओळखपत्रा'ची सक्ती
भारत आणि नेपाळमध्ये १७५१ किलोमीटरची खुली सीमा आहे, जिथून नागरिक सहज ये-जा करत असत. मात्र, आता बालेन शाह यांनी भारतीय नागरिकांसाठी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य केले आहे. कडक सुरक्षा तपासणीशिवाय आता कोणत्याही भारतीयाला नेपाळमध्ये प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील 'रोटी-बेटी'च्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Nepal's PM Balen Shah, since assuming office, has strained relations with India. Key decisions include denying meeting Indian Foreign Secretary, reviving border disputes, imposing customs duty, and enforcing ID checks, impacting Indo-Nepal ties.
Web Summary : नेपाल के पीएम बालेन शाह ने पदभार ग्रहण करने के बाद से भारत के साथ संबंधों को तनावपूर्ण बना दिया है। मुख्य निर्णयों में भारतीय विदेश सचिव से मिलने से इनकार करना, सीमा विवादों को पुनर्जीवित करना, सीमा शुल्क लगाना और आईडी जांच लागू करना शामिल है, जिससे भारत-नेपाल संबंधों पर असर पड़ रहा है।