कमी दर्जाचा कोळसा आता रोखा; सरकारकडून अदानी कंपनीला निर्देश, मुख्यमंत्र्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:29 IST2026-03-13T09:28:48+5:302026-03-13T09:29:11+5:30
राज्यातील कोळसा हाताळणीमुळे वाढणाऱ्या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेत 'अदानी' कंपनीला निम्न दर्जाचा कोळसा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

कमी दर्जाचा कोळसा आता रोखा; सरकारकडून अदानी कंपनीला निर्देश, मुख्यमंत्र्यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील कोळसा हाताळणीमुळे वाढणाऱ्या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेत 'अदानी' कंपनीला निम्न दर्जाचा कोळसा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
मुरगाव बंदर परिसरात वाढत प्रदूषणाच्या असलेल्या कोळसा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक तसेच मुरगाव पालिका सदस्य उपस्थित होते. बैठकीत कोळसा हाताळणीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोळशामुळे परिसरात धूळ आणि प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनीला आवश्यक सूचना देऊन नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे.
गोव्यातील प्रमुख कोळसा आयात आणि वाहतूक मुरगाव बंदरात केली जाते. कोळसा वापर प्रामुख्याने कर्नाटकातील स्टील व वीज प्रकल्पांसाठी होतो. दरम्यान, 'गोयांत कोळसो नाका' या घोषणेसह अनेक पर्यावरणवादी संघटनांनी कोळसा वाहतुकीला विरोध केला आहे.
विरोधी पक्षांनीही सरकारवर गोव्याला 'कोळसा हब' बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी या आरोपांना फेटाळले.
'डोम' उभारणे बंधनकारक
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, अदानी कंपनीला कमी प्रतीचा (लो-ग्रेड) कोळसा गोव्यात आणू नये, असे कळविण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आल्या आहेत. तसेच कोळशाची हाताळणी करताना उडणाऱ्या धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोळसा साठवण आणि हाताळणीसाठी 'डोम' (आच्छादित संरचना) उभारणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
...तर प्रदूषण ९५ टक्क्यांपर्यंत कमी होईल
कोळसा हाताळणी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक असेल, असे त्यांनी नमूद केले. डोममुळे कोळशावर वारा आणि पावसाचा थेट परिणाम होत नाही आणि त्यामुळे हवेत उडणाऱ्या धुळीत मोठी घट होते. मुरगाव बंदरात उभारण्यात आलेल्या अशा डोममुळे कोळसा प्रदूषण सुमारे २९५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असा दावा अधिकाऱ्यांनीही केला आहे.
डोममुळे कोळसा साठवणीची प्रक्रिया बंदिस्त होऊन धुळीचे प्रमाण कमी होईल आणि परिसरातील रहिवाशांना होणारा त्रास कमी होईल. - संकल्प आमोणकर, आमदार