२१ एप्रिल रोजी होणार उत्सव; लईराई जत्रोत्सवात आता भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:52 IST2026-02-27T12:51:19+5:302026-02-27T12:52:01+5:30
प्रशासन न्यायालयातही देणार प्रतिज्ञापत्र

२१ एप्रिल रोजी होणार उत्सव; लईराई जत्रोत्सवात आता भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : डिचोली-शिरगाव येथील देवी लईराई मंदिर येथे २१ एप्रिल रोजी होणाऱ्या वार्षिक जत्रेच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनाने व्यापक आणि काटेकोर सुरक्षा नियोजन हाती घेतले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
गतवर्षी जत्रेदरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर यंदा कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी राज्य सरकार, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन समन्वयाने काम करीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने 'वन-वे' मार्गव्यवस्था, ठिकठिकाणी बॅरिकेड्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख, तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
दरम्यान, या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ यांनी प्रशासनाकडून सविस्तर कृती आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या सूचनांनुसार, सरकारने घेतलेले निर्णय, झालेल्या बैठका आणि सुरक्षाविषयक नियोजनाचा अहवाल ६ मार्च २०२६ पर्यंत सादर करण्यात येणार आहे.
सरकारतर्फे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले की, संभाव्य गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढविणे, स्वयंसेवकांची नेमणूक करणे, तसेच आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करणे यांसारखे निर्णय घेण्यात आले आहेत. यंदाची जत्रा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भाविकांना दिलासा देणारी ठरावी, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून प्रशासनाने भाविकांनीही शिस्त आणि सहकार्य राखावे, असे आवाहन केले आहे.