दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:42 IST2025-05-24T12:41:50+5:302025-05-24T12:42:36+5:30
प्रभव नायक व चिराग नायक यांची एन्ट्री ठरतेय चर्चेचा विषय

दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: मडगाव मतदारसंघातील राजकीय घडामोडी आतापासूनच गतिमान होऊ लागल्या आहेत. विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना रोखण्यासाठी नव्या फळीतील युवा नेते विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे २०२७ची विधानसभा निवडणूक दिगंबर कामत यांच्यासाठी अटीतटीची असेल का या प्रश्नाचे उत्तर पुढील वर्षी मिळेल, कारण विधानसभा निवडणूक डणूक अजून दूर आहे आणि कामतही सक्रिय आहेत. तूर्त कामत यांनी वेट अँड वोच अशी भूमिका घेतली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बाबू नायक यांचे नातू प्रभव नायक यांनी राजकारणात प्रवेश केला आहे व उद्योजक दत्ता नायक यांचे पुत्र चिराग नायक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. मडगाव मतदारसंघातील मालभाट, आके, खारेबांध, कालकोंडा, मोतीडोंगर, कोंब, शिरवोडे, विद्यानगर येथील लोक नेहमीच दिगंबर कामत यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. गेली ४ दशके कामत हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. नगरसेवकपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९४ साली भाजपच्या तिकिटावर ५००९ मते, १९९९ साली ७५४९ मते, २००२ मध्ये पुन्हा भाजप तिकिटावर ८५२५ मते मिळाली. २००७ मध्ये कामत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस तिकिटावर ९१९८ मते मिळवली. पुढे २०१२ मध्ये १२०४१, २०१७ साली १२१०५ आणि २०२२ मध्ये काँग्रेस तिकीटावरून १३६७४ मते मिळवून निवडणूक जिंकली. पण काही दिवसांतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.
वरील आकडेवारी पाहता प्रत्येक निवडणुकीत कामत यांच्या मतदानाच्या आकडेवारीत वाढ होत आली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत त्यांची हीच मते भाजप उमेदवाराच्या पाठिशी नसल्याचे दिसून आले. हा त्यांच्यासाठी धक्का होता. मात्र, विधानसभेला तेच काय घडेल हे पुढील वर्षभरात कळेल. कामत वरचढ ठरतील की नाही ते मतदार ठरवतील. आता मडगाव मतदारसंघात नवीन नेतृत्व तयार होत असताना दिसत आहे. प्रभव नायक आणि चिराग नायक हे मातब्बर असणाऱ्या कामत यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक कामत यांच्यासाठी पूर्वीसारखी सोपी जाईल का या प्रश्नाचे उत्तर कामत यांचे समर्थक शोधत आहेत. शेवटी राजकारणात भलेभले आदळतात हेही तेवढेच खरे पण कामत मात्र शांतपणे काम करत आहेत असे त्यांचे नगरसेवक सांगतात.
राजकीय विश्लेषक प्रभाकर तिंबले यांना विचारले असता, ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे दिगंबर कामत यांनी सत्ता उपभोगली आहे. मात्र, लोकांना राजकीय बदलाची आणि मडगावात नेतृत्वबदलाची गरज निर्माण होऊ लागली आहे. मडगावसाठी काही तरी नवीन करण्यासाठी लोक यावेळी नवीन चेहरा निवडतील, अशी शक्यता आहे. २०२७च्या निवडणुकीला वेळ असून या क्षणी मडगावच्या राजकीय भवितव्याबाबत सांगता येणार नाही. पण यावेळी कामत यांना निवडणूक अवघड जाईल, हे मात्र खरे.
अॅड. राधाराव ग्रासीयस म्हणाले की, सध्या दक्षिण गोव्यातील लोक भाजप सरकारवर नाराज आहेत. हे चित्र लोकसभा निवडणुकीत स्पष्ट जाणवले आहे. चिराग नायक यांचे कुटुंब हे दिगंबर कामत यांचे समर्थक होते. कामत काँग्रेसमध्ये असताना त्यांना निवडून आणण्यासाठी दत्ता नायक व चिराग यांनी काम केले. पण कामत यांनी भाजप प्रवेश केल्याने काँग्रेस समर्थक नाराज आहेत. या काही गोष्टी कामत यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. त्यात जर प्रभव नायक यांनीही निवडणूक लढवली तर ते भाजपची मते फोडतील. एक मात्र निश्चित की कामतांसाठी विधानसभा आता सोपी नाही.
मी पर्याय देत आहे : नायक
प्रभव नायक म्हणाले की, सध्या आपण जनसंपर्क वाढवत आहे. लोकांचे सामाजिक विषय, त्यांची कामे करण्याचे काम करत आहे. मडगावावासीयांना मी चांगला पर्याय देत आहे. मतदारसंघाच्या विकासात सर्वांना सहभागी करून पुढे जाण्याचा माझा मनोदय असल्याचेही ते म्हणाले. मडगाववासीयांच्या साथीने शहरासह मतदारसंघात विविध शाश्वत कामे करण्याचा आपला मनोदय आहे. सध्या आपण लोक संपर्क वाढवत असल्याचे प्रभव नाईक यांनी सांगितले.
नवख्यांनी पूर्वीही बाजी मारली आहे
अॅड. क्लिओफातो कुतिनो म्हणाले, मडगाव आणि राज्यात राजकीय बदलाचे वातावरण तयार झाले आहे. सर्वसामान्यांमध्ये सरकारविषयी रोष आहे. त्यामुळे २०२७ची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. चिराग नायक हे जरी राजकारणात नवीन असले तरीही त्यांना काँग्रेसचे पाठबळ आहे. काही वर्षांपूर्वी मडगावचे आमदार बाबू नायक यांनाही नवोदित उमेदवारानेच पराभूत केले होते. आता येणाऱ्या काळात मडगावची जनता कशी एकजूट होऊन काय निर्णय घेते याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. परंतु, कामत जे एरवी सहज निवडून यायचे, तसे पुढे होणे शक्य नाही.