स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतन, भत्त्यात वाढ; सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 09:54 IST2026-02-05T09:52:03+5:302026-02-05T09:54:27+5:30
शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले, मांडल्या कैफियती

स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतन, भत्त्यात वाढ; सरकारचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: स्वातंत्र्यसैनिक कल्याण समितीची महत्त्वपूर्ण बैठक काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतन व भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच यापुढे स्वातंत्र्यसैनिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अंत्यसंस्कारांना बंधनकारक केली आहे.
राज्यातील स्वातंत्र्यसैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याण, सन्मान आणि हक्कांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या स्वातंत्र्यसैनिकांना दिले जाणारे मासिक निवृत्तिवेतन ९ हजार रुपयांवरून १२ हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच भत्ता ३ हजार रुपयांवरून ५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या आर्थिक सुरक्षिततेस यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास ऊर्फ दाद देसाई, उपाध्यक्ष डायस, सचिव संजय प्रभूदेसाई, ज्येष्ठ स्वा. सैनिक प्रभाकर नाईक, राया शिरोडकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, 'लोकमत'शी बोलताना दाद देसाई म्हणाले की, 'सुप्रीम कोर्टाच्या अलीकडच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या पेन्शनचा विषयही आम्ही मांडला. वैद्यकीय खर्चासाठी दिली जाणारी ३ हजार रुपये रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.' दरम्यान, स्वातंत्र्यसैनिकाचे निधन झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करतील.
मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन...
मुख्यमंत्री सावंत यांनी समितीला आश्वासन दिले की, स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्व योग्य मागण्या संवेदनशीलतेने व प्राधान्याने सोडवण्यात येतील. स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव, त्यांचा सन्मान आणि त्यांच्या त्यागाची परंपरा जपणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असून, त्यांच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सावंत यांनी यावेळी अधोरेखित केले.
'विवा पोर्तुगाल' घोषणेला परवानगी देऊ नये : स्वातंत्र्यसैनिकांचा विरोध
स्वातंत्र्यसैनिकांनी 'विवा पोर्तुगाल' अशी घोषणा करण्यास आक्षेप घेतला. याबाबतचा प्रश्न बुधवारी पत्रकारांनी विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी त्याला ठाम विरोध दर्शविला. "या घोषणेच्या बाजूने असणारे लोक पोर्तुगीजांनी स्थानिकांवर केलेल्या अत्याचारांबाबत अज्ञानी आहेत," अशी तीव्र प्रतिक्रिया स्वातंत्र्यसैनिक रोहिदास देसाई यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत इतर स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कसून चौकशी : मुख्यमंत्री
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये २० वर्षीय विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूची कसून चौकशी केली जाईल. तसे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांचे संशयास्पद मृत्यू या कॅम्पसमध्ये झालेले आहेत. सावंत म्हणाले की, याआधीच्या प्रकरणांमध्येही सखोल चौकशी झालेली आहे. आताही मी सविस्तर चौकशी अहवाल मागितला आहे.