गोव्यात चार महिन्यात ६७ जणांचा अपघाती मृत्यू, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने २९,३३८ जणांना ‘चलान’
By किशोर कुबल | Updated: September 26, 2023 20:45 IST2023-09-26T20:45:23+5:302023-09-26T20:45:58+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओने २९,३३८ जणांना ‘चलान’ दिले.

गोव्यात चार महिन्यात ६७ जणांचा अपघाती मृत्यू, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने २९,३३८ जणांना ‘चलान’
पणजी : गोव्यात अपघातांचे सत्र चालूच आहे. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात रस्ता अपघातांमध्ये ६७ जणांनी प्राण गमावले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओने २९,३३८ जणांना ‘चलान’ दिले.
बाणस्तारीचा अपघात हा सर्वात भीषण अपघात होता. आरटीओकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार मे मध्ये लहान मोठ्या एकूण २६१ अपघातांची नोंद झाली.या महिन्यात अपघातांमध्ये एकूण १८ जण ठार झाले. १६ जण गंभीर जखमी झाले. ९ चालक तर ७ पादचारी ठार झाले. वाहतूक नियम तोडल्या प्रकरणी ७३७ जणांना ‘चलान’ देण्यात आले..
जूनमध्ये वाहतूक नियम तोडल्या प्रकरणी ११,१८७ जणांना ‘चलान’ देण्यात आले. या महिन्यात रस्ता अपघातांमध्ये १७ जण ठार झाले. १८ जण गंभीर जखमी झाले. लहान मोठ्या एकूण २३१ अपघातांची नोंद झाली. अपघातांमध्ये ८ चालक ठार झाले तर मागे बसलेले चार व दोन पादचारी ठार झाले.
जुलैमध्ये लहान मोठ्या एकूण २०९ अपघातांची नोंद झाली. वाहतूक नियम उल्लंघनात ७२५१ जणांना ‘चलान’ देण्यात आले. अपघातांमध्ये २१ जण ठार झाले. १२ जण गंभीर जखमी झाले. १३ चालक ठार झाले तर मागे बसलेला एक व पाच पादचारी ठार झाले.
ॲागस्ट महिन्यात वाहतूक नियम उल्लंघनाबद्दल १०,१६३ वाहनचालकांना ‘चलान’ देण्यात आले. या महिन्यात रस्ता अपघातांमध्ये ११ जण ठार झाले. १७ जण गंभीर जखमी झाले. लहान मोठ्या एकूण २३२ अपघातांची नोंद झाली. अपघातांमध्ये ९ चालक ठार झाले तर मागे बसलेले दोघे व एक पादचारी ठार झाला.