लोकांना जर प्रकल्प नको, तर सरकार लादणार नाही: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:52 IST2026-03-01T11:51:25+5:302026-03-01T11:52:43+5:30
मीराबाग बंधारा प्रकल्पाविरुद्ध आंदोलनाची घेतली दखल

लोकांना जर प्रकल्प नको, तर सरकार लादणार नाही: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकांना जर एखादा प्रकल्प नको असेल, तर सरकार तो लोकांवर लादणार नाही. शेवटी विकास हा लोकांसाठीच सरकार करीत आहे. मात्र जर त्यांना नको असेल, तर तो केला जाणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
मीराबाग सावर्डे येथील लोक बंधारा प्रकल्पाविरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. सरकार दखल घेत नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या विषयाची कल्पना असून, ते त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
नाईक म्हणाले की, राज्यातील भाजप सरकार विकास साधत आहे. विकास हा लोकांसाठी केला जात आहे. मात्र, जर लोकांचा एखाद्या विकास प्रकल्पाला विरोध होत असेल, तर तो प्रकल्प सरकार त्यांच्यावर लादणार नाही. सदर विकास प्रकल्पाचे काम सरकार पुढे नेणार नाही. शेवटी लोकांना जे हवे आहे, तेच सरकारलादेखील हवे आहे. आम्ही नेहमीच लोकांचा विचार करतो.
मीराबाग सावर्डे येथील लोक बंधारा प्रकल्पाला विरोध करीत आहे. मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना असून, ते त्यात निश्चितच लक्ष घालतील, असे त्यांनी सांगितले. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष व आप दरम्यान युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत मला कुठलीही कल्पना नाही. कारण, सदर विषय त्या दोन्ही पक्षांमधील आहे.