अध्यक्षाचा अवमान करणारे पक्ष कार्यकर्ते कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:35 IST2025-06-28T13:35:13+5:302025-06-28T13:35:13+5:30
भाजप हा राजकारणातला वटवृक्ष आहे. नाराज झालेला राजकीय नेता भारतीय जनता पार्टीला खिंडार पाडेल, हा काहीजणांचा युक्तिवाद हास्यास्पद वाटतो.

अध्यक्षाचा अवमान करणारे पक्ष कार्यकर्ते कसे?
दत्ता खोलकर, म्हापसा
केंद्रातील मोदी सरकारला नुकतीच अकरा वर्षे पूर्ण झाली. या निमित्त देशभर भारतीय जनता पार्टी तर्फे 'संकल्प से सिद्धी तक' अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत संकल्प सभेसाठी साळगाव मतदारसंघात मार्गदर्शन करण्यासाठी गेलो असता, एक जुना कार्यकर्ता भेटला. म्हणाला, '१९९१ मधील लोकसभा निवडणुकीत, मनोहरभाई यांच्या प्रचारात पोस्टर लावून पक्षकार्यात सामील झालो. पक्षाच्या आंदोलन कार्यक्रमातसुद्धा सहभागी झालो. २०१२ मध्ये पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताचे सरकार निवडून आल्याने आम्ही कार्यकर्ते धन्य झालो. आमच्या कामाची पावती मिळाली. गेल्या अकरा वर्षातील मोदीसाहेबांच्या अभूतपूर्व कामगिरीचा आम्हा कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान आहे. भाजपचे काम करण्याची संधी मिळाली, यासाठी मी पक्षनेत्यांचा कृतज्ञ आहे.' त्याचे विचार ऐकून मी थक्क झालो. कारण भाजप अशा लाखो निःस्वार्थी, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या सेवाभावी व समर्पक वर्तनामुळेच, आज जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष बनला आहे.
भाजप कार्यकर्ते व्यक्तिगत हित किंवा लाभासाठी पक्ष काम करत नाहीत. तर सेवा, अनुशासन व पक्षाने दिलेल्या जबाबदारीच्या भावनेने प्रेरित झाल्यामुळे स्वतःला पक्षासाठी समर्पित करतात. सरकारात असो किंवा विरोधात, भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलात काहीही फरक पडत नाही. पक्षाचे केडर हे भाजपचे सगळ्यात मोठे धन आहे. पक्षाची ध्येयधोरणे मानणारेच मनापासून पक्षकार्य करू शकतात. भाजप राष्ट्र प्रथम, संघटना द्वितीय व व्यक्ती अंतिम हा सिद्धान्त मानते. जर कोणीही नेता किंवा कार्यकर्ता या ध्येयापासून विचलित झाला तर तो आपली वेगळी वाट शोधतो. भाजप कार्यकर्त्यांना व्यक्तिगत हित आणि राष्ट्रहित यामधील एक धोरण स्वीकारावे लागते. जे व्यक्तिगत हित व स्वतःचा स्वार्थ सर्वोत्तम मानतात, त्यांची घुसमट निश्चित असते. ते पक्षाच्या कामात समरस होऊ शकत नाहीत, हे निश्चित असते. दोन तीन पावसाळे पक्षात घालवल्याने पक्षाची कार्यपद्धती आणि संघटन शिष्टाचार समजत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
भाजप म्हणजे राजकारणातील वटवृक्ष. वटवृक्ष हे एक असामान्य आकाराचे झाड. याची उंची सुमारे तीस मीटरपर्यंत पोहोचते आणि बाजूने अनिश्चित काळासाठी पसरते. त्याच्या फांद्यांमधून विकसित होणारी हवाई मुळं जमिनीत खाली उतरताना नवीन खोड बनण्यासाठी मूळ धरतात. वडाची एखादी फांदी तुटली किंवा पाने गळली म्हणून त्याला काहीही फरक पडत नाही. या झाडाची सावली सगळ्यांना आश्रय देत असते. भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्या देशातील राजकारणात वटवृक्षाचे रूप धारण केले आहे. भाजप आज १४ करोड सभासदांचा असामान्य राजकीय पक्ष बनला असून, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे भक्कम सरकार व बहुतांश राज्यात स्वतःची किंवा संयुक्त सरकारे उत्तमरीत्या कार्यरत आहेत. या पक्षात कार्यकर्ता हा प्रमुख आधार असल्याने व्यक्तिगत कारणासाठी पक्षापासून फारकत घेतलेले नेते पक्षाचे नुकसान करू शकत नाही, हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे. यापूर्वी केशुभाई पटेल, येडीयुरप्पा, कल्याण सिंग, मदनलाल खुराना, असे कित्येक मातब्बर नेते पक्ष सोडून गेले व आपली पत घालवून बसले. गोव्यात सुद्धा या पक्षात सामील झालेल्या काही नेत्यांनी व्यक्तिगत कारणास्तव किंवा उमेदवारी नाकारल्याने पक्षत्याग केला व राजकारणातून इतिहासजमा झाले, हे आपण अनुभवले आहे.
अलीकडेच एका राजकारण्याने प्रदेशाध्यक्षांविषयी प्रश्न उपस्थित केला. हा दामू नाईक कोण? त्यांना कारवाई बाबतीत बोलण्याचा अधिकार आहे काय? असे प्रश्न विचारले जाणे हे हास्यास्पद आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीबद्दल अनभिज्ञता असल्यानेच असे प्रश्न उद्भवतात. पक्षातील संघटनेचे संस्कार आणि शिष्टाचाराची जाण नसलेले राजकीय कार्यकर्ते पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान देऊ शकतात काय? खरे तर, दामू नाईक, हे राज्यातील चार लाख चौवीस हजार पार्टी सभासदांनी निवडून दिलेले पदसिद्ध प्रदेश अध्यक्ष आहेत. पार्टीच्या आठ महिन्यांच्या खडतर संघटन निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांची एकमताने निवड झाली आहे. गेली तीस वर्षे त्यांनी पक्षाचे सक्रियपणे काम केले असून संघटनेत विविध पदे यशस्वीरीत्या भूषवलेली आहेत. त्यांच्या रूपाने पक्षाला बहुजन समाजातील तडफदार नेतृत्व लाभलेले आहे. २००२ मध्ये कमी वयात ते फातोर्डा मतदारसंघाचे आमदार बनले. सलग दहा वर्षे आमदारकीचे उत्तमरीत्या कार्य केले. सात वर्षे विरोधी पक्षात वावरताना, त्यांनी पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ कामात छाप पाडली. राज्यातील ज्वलंत प्रश्न विधानसभेत समर्थपणे मांडले व राज्यातील लोकांची वाहवा मिळवली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या दरम्यान त्यांनी सत्तेसाठी पक्षांतर केले नाही. पक्षनिष्ठा ही त्यांच्यासाठी सर्वोच्च असून, पक्षाची ध्येय धोरणे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. भाजपा प्रदेश अध्यक्षपदाचा मान न ठेवता त्यांच्या बद्दल गैरविधाने करणारे पक्षाचे समर्थक असू शकत नाही, हे समजून घेणे आवश्यक वाटते.
खरे तर, १९८७ साली गोव्याला घटकराज्य दर्जा प्राप्त झाला, ज्यामुळे येथील विधानसभा मतदारसंघाची संख्या २८ वरून ४० पर्यंत वाढविण्यात आली. नवीन मतदारसंघ रचनेत फोंडा तालुक्यात प्रियोळ मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यामुळे प्रियोळसाठी पहिली विधानसभा निवडणूक १९८९ मध्ये लढविण्यात आली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तत्कालीन नेते डॉ. काशिनाथ जल्मी यांनी १९८९ आणि १९९४ या दोन्ही निवडणुकीत विजय प्राप्त केला. पुढे, १९९९मधील निवडणुकीत भाजपातर्फे विश्वास सतरकर यांनी येथे विजय मिळवला. त्यांनी परत २००२ मध्ये सुद्धा हा मतदारसंघ जिंकला. त्यानंतर, २००७ व २०१२ मध्ये प्रियोळ मगो पार्टीने काबीज केला. २०१७ मध्ये अपक्ष उमेदवाराने भाजप पाठिंब्यामुळेच येथे विजय प्राप्त केला. खरे तर, त्यांनी भाजपला पाठिंब्यासाठी विनंती पत्र सादर केले होते. कारण, २०१२ मध्ये अपक्ष म्हणून ते पराभूत झाले होते. २०२२ साली सध्याच्या आमदाराने हा मतदारसंघ निसटत्या फरकाने जिंकला. म्हणजेच, आतापर्यंत प्रियोळ मतदारसंघात भाजपा किंवा मगो पार्टीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे, ही सिद्ध होते.
लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत प्रियोळ विधानसभा मतदारसंघ २००९ पासून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सामील करण्यात आला. २००९ ते २०२४ पर्यंत पार पडलेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना प्रचंड मतांची आघाडी प्राप्त करून दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे मतदार आणि मूळ कार्यकर्ते अजूनही सक्रिय असून, हा मतदारसंघ पक्षासाठी बहाल करण्यास सक्षम आहेत.
नाराज झालेला राजकीय नेता भारतीय जनता पार्टीला खिंडार पाडेल, हा काहीजणांचा युक्तिवाद हास्यास्पद वाटतो. खरे तर, गोव्यात स्व. मनोहर पर्रीकर व श्रीपाद नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम शून्यातून सुरू केले. त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. स्वतःला पक्ष कामाला वाहून घेतले. कार्यकर्त्याची जमवाजमव करून या पक्षाचा मजबूत पाया रचला. कालांतराने, पक्षाचे नवीन नेतृत्व उभे झाले. आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, सदानंद शेट तानावडे सारखे नेते पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दैदीप्यमान यश गाठले असल्याचे आपण पाहतो. सत्तेत सहभागी होण्यासाठी राजकीय नेते येत राहतात. काही जण पक्षात जुळवून घेतात. तसेच काही निघून जातात सुद्धा. परंतु, या सगळ्या गोष्टींचा पक्षाच्या भवितव्यावर कसलाही परिणाम होणार नाही, हे निश्चित. देशहित व पक्षनिष्ठेला सर्वोत्तम मानले जाते, व्यक्तीहित नव्हे, हेही तितकेच खरे.