गोविंद गावडे यांनी दंड थोपटले; भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:59 IST2025-06-24T12:58:33+5:302025-06-24T12:59:20+5:30
तांत्रिकदृष्ट्या पक्ष व आमदारकी सोडायची नाही; पण पुढील दीड वर्ष पक्षात राहून सरकारला जेरीस आणायचे अशी खेळी गोविंद गावडे खेळू शकतात.

गोविंद गावडे यांनी दंड थोपटले; भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करणार
भाजपमध्येच राहायचे; पण भाजप सरकारला कधी चिमटे काढत, तर कधी ठोसे लगावत सरकारमधील काही नेत्यांची अडचण करायची, अशी रणनीती पूर्वी एकदा (स्व.) विष्णू वाघ यांनी अवलंबिली होती. काही वर्षांपूर्वी थिवी मतदारसंघात वाघ यांच्यावर तेव्हा हल्लाही झाला होता. त्या हल्ल्यामागचा मेंदू कुणाचा होता, याचीही सर्वांना कल्पना आहे. एकंदरीत वाघ यांनी भाजपमध्ये राहून काही भाजप नेत्यांशी संघर्ष केला होता. आता गोविंद गावडेही भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करतील, असेच दिसते.
तांत्रिकदृष्ट्या पक्ष व आमदारकी सोडायची नाही; पण पुढील दीड वर्ष पक्षात राहून सरकारला जेरीस आणायचे अशी खेळी गोविंद गावडे खेळू शकतात. खांडोळा येथे रविवारी गावडे यांनी सभा घेतली. मंत्रिपद काढून घेऊन आपल्यावर अन्याय केला गेला, केंद्रीय नेतृत्वानेही आपली बाजू ऐकून घेतली नाही, असा सूर गावडे यांनी सभेत आळवला. सभेला बऱ्यापैकी गर्दी झाली होती. प्रियोळ मतदारसंघातील युवावर्ग अजून गोविंद गावडे यांच्यासोबत आहे, असा संदेश खांडोळ्यातील या सभेतून मिळाला आहे. मात्र, गावडे यांना भाजपशी किंवा भाजप सरकारशी संघर्ष करणे परवडणार आहे का? २०२७ची विधानसभा निवडणूक गावडे भाजपच्या तिकिटावर लढूच शकणार नाहीत. कारण ते मनातून दुखावले गेले आहेत. मनाने आता ते भाजपसोबत नाहीत, हे रविवारचे त्यांचे पूर्ण भाषण ऐकून कुणीही केंद्रीय नेता सांगू शकेल, मख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही याची कल्पना आली असेलच.
मायकल लोबो यांनीही २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपशी संघर्ष केला होता. भाजपमध्ये राहून भाजपच्या सरकारला शिंगावर घेण्याचा प्रयत्न करून मग शेवटी लोबोंनी भाजपचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसच्या तिकिटावर कळंगुटमधून लढले आणि निवडून आले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत हा भाग वेगळा. गोविंद गावडे लोबो यांच्याच मार्गाने जात आहेत; पण एकदा भाजप सोडल्यावर पुन्हा त्यांना भाजपमध्ये येण्याची गरज भासणार नाही. कारण प्रियोळ मतदारसंघात त्यांनी स्वतःचे म्हणून स्थान निर्माण केले आहे, हे मान्य करावे लागेल. गावडे पुढील दीड वर्ष भाजपमध्ये राहतील. नंतर ते स्वतःचा मार्ग धरतील, असे आता राजकीय विश्लेषक सांगू शकतात. गावडे मुळातच स्वखुशीने भाजपमध्ये आले नव्हते. त्यांना भाजपच्या काही नेत्यांनी आग्रहाने पक्षात आणले होते. भाजपच्या तिकिटावर ते गेली निवडणूक लढले; पण जिंकून येताना मात्र बराच घाम फुटला होता. अवघ्या २१३ मतांनी ते त्यावेळी निवडून आले.
गोविंद गावडे यांच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता आहे. सध्याच्या सरकारमधील अनेक गुपिते व घोटाळेही त्यांना ठाऊक आहेत. मुख्यमंत्री सावंत जाहीरपणे गोविंद गावडे यांना आणखी दुखवायला जाणार नाहीत, असे वाटते. कारण गावडे एकदा बोलू लागले तर सरकारमधील अनेकांना ते जखमी करू शकतात. यापुढे कला अकादमीचा विषय विद्यमान सरकार कसा हाताळते, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. अकादमीच्याच विषयावरून गावडे जास्त वादाचा विषय अगोदर ठरले होते. कलाकारांनी गावडे यांच्या विधानांबाबत कायम नाराजी व्यक्त केली. कला अकादमीवर साठ कोटी रुपयांचा खर्च झाला; पण नूतनीकरण योग्यप्रकारे झालेच नाही, असा आक्षेप सगळीकडून घेतला गेला. वास्तविक हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले होते; पण गावडे हेच त्याबाबत जास्त बोलत राहिल्याने लोकांनी गावडे यांच्याकडेच सदोष कामाबाबत बोट दाखविले.
एसटी बांधवांमध्ये सध्या चलबिचल आहे. कारण गावडे यांनी आपण एसटी बांधवांचे प्रश्न मांडले म्हणून आपल्याला डच्चू दिला गेला असा युक्तिवाद केला आहे. आदिवासी खात्याच्या कारभारावर केलेले आरोप त्यांनी मागे घेतलेले नाहीत. आरोपांची चौकशी व्हावी, असेही अप्रत्यक्षरीत्या गावडे यांनी रविवारी सुचविले. फोंडा तालुक्यातील एसटी बांधवांशी गावडे यांचा जास्त संवाद व संपर्क आहे. शिरोड्यात आपणच सुभाष शिरोडकर यांना निवडून आणले असाही दावा ते करतात. अर्थात हा दावा पटणारा नाही. मात्र, गावडे यांनी तूर्त दंड थोपटले असल्याने मुख्यमंत्र्यांनाही थोडे सावध व्हावे लागेल.