मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मेहनत करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:32 IST2026-02-07T11:31:12+5:302026-02-07T11:32:20+5:30
सेंट मेरी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसह पाहिला'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम

मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मेहनत करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसमोर नवा विचार, नवे संकल्प आणि नवी स्वप्ने मांडत आहेत. केवळ परीक्षा ताण कमी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश नसून, त्यातून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा, मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले.
येथील सेंट मेरी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसह त्यांनी 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम पाहिला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, त्यासाठी योग्य दिशा मिळावी, यासाठी ते प्रेरणादायी विचार मांडतात. विद्यार्थ्यांनी आवर्जून हा कार्यक्रम पाहावा. शिक्षक, पालकांनीही विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे. संपूर्ण भारताचे ज्ञान आणि व्यापक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहेत.
मुख्ममंत्री म्हणाले, की विकसित भारत २०४७ हे मोठे स्वप्न घेऊन देश वाटचाल करत आहे. या वाटचालीत प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला एक प्रगतशील देश देण्यासाठी पंतप्रधान सातत्याने काम करत आहेत.
'विकसित गोवा २०३७' हा मंत्र घेऊन राज्य सरकार गोव्याला प्रगतीपथावर नेत असून, या प्रक्रियेत प्रत्येक गोमंतकीयाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
प्रत्येक मुलाने 'मन की बात' पाहावा
आजच्या काळात आपण पुस्तके कमी वाचत असल्याने 'परीक्षा पे चर्चा'सारखा अर्धा तासाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर घालणारा ठरेल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले. 'परीक्षा पे चर्चा'बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रमही प्रत्येकाने आवर्जून पाहायला हवा. देशात नेमके काय घडत आहे, नवीन तंत्रज्ञान देशाला कुठल्या दिशेने नेत आहे तसेच विकासाची वाटचाल नेमकी कुठे चालली आहे, याची सविस्तर माहिती 'मन की बात' कार्यक्रमातून मिळते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.