'वंदे मातरम्'च्या गौरवशाली वाटचालीवर विधानसभेत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:46 IST2026-01-14T08:46:00+5:302026-01-14T08:46:27+5:30
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात त्यासंबंधीचा ठराव मांडला त्यावर तब्बल दीड तास चर्चा झाली.

'वंदे मातरम्'च्या गौरवशाली वाटचालीवर विधानसभेत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'वंदे मातरम्' राष्ट्रगीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विधानसभेत काल विशेष चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात त्यासंबंधीचा ठराव मांडला त्यावर तब्बल दीड तास चर्चा झाली.
मुख्यमंत्री हा ठराव मांडताना म्हणाले की, '१८७५ मध्ये प्रख्यात बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले 'वंदे मातरम्' हे गीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान ठरले. देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांना एकत्र आणणारे, जनतेत राष्ट्रप्रेम चेतवणारे आणि राष्ट्रीय चेतना जागवणारे हे गीत स्वातंत्र्य चळवळीचे प्रभावी प्रतीक आहे. या गीताच्या साहित्यिक श्रेष्ठतेसह त्यातील भावनिक आवाहनाने भारतीय राष्ट्रीय अस्मिता घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १५० वर्षाचा हा ऐतिहासिक टप्पा देशाच्या एकतेचा, देशभक्तीचा आणि घटनात्मक मूल्यांचा पुनरुच्चार करण्याची संधी आम्ही या विशेष चर्चेच्या निमित्ताने घेत आहोत.'
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शाळा आणि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठी 'वंदे मातरम्' या विषयावर परिसंवाद आणि चर्चा आयोजित करण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना देशाच्या मूल्यांशी सक्रियपणे जोडले जाईल आणि देशाबद्दल प्रेमाची सखोल भावना निर्माण होईल यावर त्यांनी भर दिला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सरकारवर टीका करताना म्हणाले की, 'वंदे मातरम्'चा खरा अर्थ म्हणजे बर्च आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २५ लोकांची जबाबदारी घेणे होय. सरकारने गोवा विकायला काढला आहे. आपण आपल्या जमिनीचे रक्षण करू शकत नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. तरुणांनी 'वंदे मातरम्' म्हणावे आणि पुढे जावे. वंदे मातरम् हे कोणत्याही राजकीय विचारसरणीचे मालक असू शकत नाही. ते करुणा, धैर्य दर्शवते आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देते, असेही युरी म्हणाले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी चर्चेत मराठीतून आपले विचार मांडले. त्यांनी 'वंदे मातरम' राष्ट्रगीत सविस्तरपणे गात त्याचा अर्थ सांगितला. देश सुजलाम, सफलाम बनवण्याच्या दिशेने सरकारची पावले पुढे पडत आहेत, असे ते म्हणाले.
गोवा फॉरवर्ड चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. सत्ताधारी भाजपने राष्ट्रीय गीताचा वापर त्यांच्या अपयशासाठी ढाल म्हणून केल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, पारदर्शकतेची जागा अंधाराने घेतली आहे. भाजप सरकार 'वंदे मातरम् अंतर्गत आपले कर्म लपवू शकत नाही. गोवा सुजलाम सफलम करण्यात, जमिनीचे रक्षण करण्यात आणि न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.'