Goa Election 2022 : पाच वर्षांत असे काम करून दाखवू की काँग्रेस आणि भाजपला लोक विसरतील : अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 21:46 IST2022-02-11T21:46:28+5:302022-02-11T21:46:50+5:30
आम आदमी पक्षाला एकदा संधी देण्याचे केजरीवाल यांचे आवाहन.

Goa Election 2022 : पाच वर्षांत असे काम करून दाखवू की काँग्रेस आणि भाजपला लोक विसरतील : अरविंद केजरीवाल
पणजी : "पाच वर्षांत आम्ही असे काम करून दाखवू की काँग्रेस आणि भाजपला लोक विसरून जातील. गोव्याच्या जनतेने 'आप'ला एकदा संधी द्यावी," असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. म्हापसा बसस्थानक दहा वर्षे पूर्ण होऊ शकले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हेलिपॅड मात्र २४ तासात उभारले जाते, अशी टीका करत त्यांनी भाजपवर तोफ डागली.
''लूट करण्यासाठी दहा वर्षे अपुरी पडली म्हणून आणखी पाच वर्षे गोव्याच्या जनतेकडे भाजप सत्ता मागत आहे,'' असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. गोव्यात भाजप किंवा काँग्रेसनेही काहीच केले नाही. येथील वीज, पाण्याची तसेच आरोग्य समस्या कायम आहेत. भाजपला आणखी पाच वर्षे दिली तर सरकार लूटच करील. आम आदमी पक्षाने दिल्लीत काम करून दाखविले, त्यामुळे दिल्लीतील जनता खुश असल्याचेही ते म्हणाले.
"काँग्रेसला मत देणे म्हणजे भाजपला मत देण्यासारखेच आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून दिले होते. यातील १५ आमदार पक्ष सोडून गेले. भाजपला पराभूत करायचे असेल तर आम आदमी पक्षाशिवाय पर्याय नाही. काँग्रेस व फॉरवर्ड किंवा इतर पक्षांना मत देऊन आपले मत वाया घालवू नका,'' असे केजरीवाल म्हणाले.