४११ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई; १३९ जणांना येत्या दोन दिवसांत मिळणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:59 IST2025-12-30T07:59:46+5:302025-12-30T07:59:46+5:30
अवकाळी पावसाचा बसला होता फटका : ४३ लाख खात्यात

४११ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई; १३९ जणांना येत्या दोन दिवसांत मिळणार मदत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : अवकाळी व मुसळधार पावसामुळे डिचोली तालुक्यातील नुकसान झालेल्या ५५० पैकी ४११ शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई खात्यात नुकसान भरपाई जमा झाली आहे. उर्वरित १३९ शेतकऱ्यांनाही येत्या दोन तीन दिवसांत जमा केली जाणार आहे. सुमारे ४३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.
अवकाळी पडलेल्या पावसामुळे डिचोली तालुक्यातील कापणीसाठी आलेले भातपिक उद्धवस्त झाल्याने तसेच इतर पिकांचीही हानी होऊन तालुक्यातील सुमारे सहाशेच्या आसपास शेतकऱ्यांची लाखो रुपयांची नुकसान झाले होते.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत भरपाई खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तातडीने प्रक्रिया पूर्ण केली होती. सुमारे ५५० शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केले होते त्यातील ४११ जणांना खात्यावर ४२ लाख ३९ हजार रुपये जमा झालेले आहेत.
उर्वरित १३९ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असून ती सुद्धा तातडीने वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी खात्यातर्फे देण्यात आली. डिचोली विभागीय कृषी खात्याच्या अधिकारी नीलिमा गावास यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की. १३९ जणांना नुकसान भरपाई दिली नसून येत्या दोन-तीन दिवसात त्यांनाही मदत वितरित केली जाईल.
अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची मोठी नुकसानी झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात झालेल्या भातशेती व इतर शेती बागायतींचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे करून तातडीने फास्टट्रॅकवर अर्ज व आढावा घेऊन कृषी संचालकांना पाठवले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्यात मदतीचे वाटप सुरू करण्यात आले व या अंतर्गत आतापर्यंत तालुक्यात ४११ जणांना मदत मिळाल्याचे सांगण्यात आले ज्यांना अद्याप मदत मिळालेली नाही त्या सर्वांना मदत आगामी दोन दिवसात निश्चितपणे मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेताना तातडीने दखल घेतलेली होती. आपण स्वतः या संदर्भात पाठपुरावा करत होतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने मिळावी यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे. काहीवेळा तांत्रिक बाबींमुळे थोडासा विलंब होत असला तरी मदत शंभर टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्यास सरकार सातत्याने पाठपुरावा करीत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.