साखळीतील ८० टक्के विकासकामे पूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:56 IST2026-01-05T12:55:59+5:302026-01-05T12:56:36+5:30
अमृत मिशनअंतर्गत वाळवंटी नदी सुशोभीकरण कामाची पायाभरणी

साखळीतील ८० टक्के विकासकामे पूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: पणजी शहरानंतर २०१६ साली साखळी शहराचा विकास नियोजन आराखडा तयार केला होता. या विकास आराखड्यानुसार साखळी शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. विकास आराखड्यातील ८० टक्के कामे पूर्ण झालीत. आज हे शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक साखळीवासीयाची आहे. शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी राहिले तर साखळीत येण्याची व राहण्याची ओढ लोकांमध्ये वाढेल आणि व्यावसायिकदृष्ट्याही साखळीची प्रगती होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.
अमृत मिशन २.० अंतर्गत सुमारे ८ कोटी रुपये खर्चून साखळीतील वाळवंटी नदीच्या सुशोभीकरण कामाची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली. साखळी नगरपालिका सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, निकिता नाईक, रश्मी देसाई, दीपा जल्मी, अंजना कामत, मुख्याधिकारी श्रीपाद माजिक उपस्थित होते.
साखळी शहर हे सर्व सोयींनीयुक्त शहर बनत आहे. या शहराची व्याप्ती वाढत आहे. केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण साखळीत उपलब्ध असल्याने लोक वास्तव्यासाठी साखळीला प्राधान्य देत आहेत. हे सर्व करत असताना हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. निवडून आल्यानंतर २०१२ साली आपण दिलेला 'हरित हरवळे, विकसित विर्डी व सुंदर साखळी' हा नारा प्रत्यक्षात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रस्तेही लवकरच रुंद होतील
२०१२ साली आमदार झाल्यावर साखळी बसस्थानक, नगरपालिका इमारत, पोलिस चौकीची इमारत, सर्व मुख्य नाल्यांची स्वच्छता, स्विमिंग पूल, इनडोअर क्रीडा प्रकल्प, रवींद्र भवन हे प्रकल्प चालिस लागले. शहर नियोजन आराखड्यानुसार सुपाचीपुड ते सरकारी सामाजिक इस्पितळापर्यंतचा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू आहे. सरकारी इस्पितळ ते दत्तवाडी पुलापर्यंतचे रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण, साखळी बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचे रस्ता रुंदीकरण व त्याचेही सुशोभीकरण, साखळी बाजारात सोयी-सुविधा व इतर गोष्टी पुरवण्याचे काम लवकरच सुरू होईल. प्रत्येकाने समंजसपणा दाखवल्यास ही कामे लवकर पूर्ण होतील, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
सांडपाणी सोडणाऱ्यांवर होणार कारवाई
नगराध्यक्षा प्रभू यांनी सांगितले की, साखळी शहराचा व संपूर्ण मतदारसंघाचा विकास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यांना सांगितलेली विकासाची प्रत्येक गोष्ट साखळीवासियांसाठी प्रत्यक्षात उपलब्ध होत आहे.
विकासाबरोबरच स्वच्छ व सुंदर साखळीचा नारा पुढे नेताना सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नगरपालिकेला मुक्तहस्तही देण्यात आला आहे. आपला परिसर स्वच्छ व निरोगी ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे नगराध्यक्षा म्हणाल्या.
वाळवंटी नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पामध्ये प्रवेशद्वार, बालोद्यान, खुले उद्यान, जिम, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक अशा विविध सोयी-सुविधा असतील.