वाघाच्या हल्ल्यात महिला शेतकरी ठार; मानेला पकडून १०० मीटर नेले फरपटत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 18:13 IST2022-05-13T17:57:19+5:302022-05-13T18:13:45+5:30
ती जीव वाचविण्यासाठी जवळ असलेल्या सागाच्या झाडाचा आसरा घेऊन झाडावर चढली खरी, मात्र झाड कमी उंचीचे असल्याने वाघाने झडप घालून तिला खाली खेचले व तिच्या मानेला पकडून १०० मीटर फरपटत नेले.

वाघाच्या हल्ल्यात महिला शेतकरी ठार; मानेला पकडून १०० मीटर नेले फरपटत
आरमोरी (गडचिराेली) : उन्हाळी धान पिकाला नहराचे पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. नलूबाई बाबूराव जांगळे (३६, रा. अरसाेडा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
नलूबाई जांगळे हिचे पती अपंग असल्याने कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी ती शेतीचे काम स्वतः करीत होती. नहरालगत शेत असल्याने नलूबाई हिने उन्हाळी धान पीक लावले हाेते. धान पिकाला पाणी देण्यासाठी शुक्रवारी ती सकाळी शेतावर गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्याकडे आगेकूच केली. वाघाला बघता आरडाओरड करून ती जीव वाचविण्यासाठी जवळ असलेल्या सागाच्या झाडाचा आसरा घेऊन झाडावर चढली खरी, मात्र झाड कमी उंचीचे असल्याने वाघाने झडप घालून तिला खाली खेचले व तिच्या मानेला पकडून १०० मीटर फरपटत नेले. यावेळी शेताजवळचे शेतकरी मदतीला धावले. मात्र, तोपर्यंत तिचा जीव गेला होता. जवळपास एक तास वाघ घटनास्थळी थांबला होता. लोक जेव्हा शेताकडे गेले तेव्हा जमाव पाहून वाघाने धूम ठोकली.