महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर येऊन 'असा' पार पडला विवाहसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:56 IST2020-05-15T13:51:57+5:302020-05-15T13:56:21+5:30
अहेरी तालुक्यातील महागाव येथे सोशल डिस्टन्सिंचे काटेकोरपणे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत एक आदर्श विवाह पार पडला. या विवाहाप्रसंगी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर येऊन 'असा' पार पडला विवाहसोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव येथे सोशल डिस्टन्सिंचे काटेकोरपणे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत एक आदर्श विवाह पार पडला. या विवाहाप्रसंगी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
आलापल्ली येथील बेबी बंडू येरमासेट्टी यांची कन्या शुभांगी आणि कपिल जुगनु डेंगिया रा. हैदराबाद तेलंगाना यांचा विवाह निश्चित झाला होता. परंतु लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकलण्यात आला. परंतु दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे रूग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढविला जाण्याची शक्यता आहे. ही बाब ओळखून येरमासेट्टी व डेंगिया कुटुंबाने लॉकडाऊनमध्येच विवाह उरकण्याचा निश्चय केला. त्यानुसार नवऱ्या मुलाने परवानगी घेऊन पाच पाहुणे गुडममार्गे आणले. वधुपक्षाकडील लोकांनीही या विवाहासाठी शासनाकड़ून परवानगी घेतली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळून दोन राज्याच्या सीमेवर एकूण ३० लोकांच्या उपस्थितीत वांगेपल्ली नदी घाटावरील शिवमंदिरात हा विवाह आदर्श परंपरेनुसार पार पडला. या विवाहामुळे दोन्ही पक्षाकडील बरीच आर्थिक बचत झाली. तसेच परंपरेनुसार विवाह होण्यास मदतही झाली. या विवाह सोहळ्याला दोन्ही पक्षाकडील एकूण ३० नातेवाईक तसेच पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.