लोकमत न्यूज नेटवर्कवडधा : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही. गरिबीमुळे वाघाच्या भीतीच्या सावटातही उपजीविकेसाठी जंगलातून सरपण आणावे लागते. वाघ शिकारीवर टपूनच असतो व हल्ला करतो. देऊळगावातही हेच घडले. सरपण गोळा करताना दोन महिलांना वाघाने भक्ष्य बनविले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दोन घटना आरमोरी तालुक्यात बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्या. वाघाच्या दहशतीतही सरपणाने चुली पेटविणाऱ्या दोन मातांची अखेर चिताच पेटली.
जंगलालगतच्या गावात सरपणासाठी जाणे हा महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग. मात्र, हीच दिनचर्या दोन मातांसाठी मृत्यूचे दार ठरली. मुक्ताबाई दिवाकर नेवारे (वय (७०) आणि सरस्वताबाई झिगर ताघ (वय ७०, रा. देऊळगाव, ता. आरमोरी) या दोन्ही महिलांचे मृतदेह बुधवारी दोन वेगवेगळ्या शोधमोहिमेत सापडले.
मुलाला वाटले आई गेली ताईकडे, पण घडले आक्रीत; आठ दिवसांपासून सुरू होता शोध सरस्वताबाई झिगर वाघ ह्या देऊळगाव येथील झोपडपट्टी टोलीवर राहत होत्या. शेती नसल्यामुळे कुटुंब मोलमजुरीवर, मुलापासून वर्षानुवर्षे दूर राहणाऱ्या सरस्वताबाईचा संसार तुटका, पण मन मात्र मुलांकडेच. १२ नोव्हेंबरला त्या सरपणासाठी घराजवळच्या झुडपी जंगलात गेल्या. दिवस गेला... दोन दिवस गेले... मुलाला वाटले त्या कदाचित सावत्र मुलीकडे सावलखेडा येथे गेल्या असतील. शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर आठ दिवसांनी घराजवळील झुडपी जंगलातून येणाऱ्या दुर्गंधीने सर्वांचे लक्ष वेधले. शोथमोहिमेअंती घरापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी जमा केलेल्या काड्या, परिसरात वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. त्यामुळे वाघाने हल्ला केल्याचा संशय वास्तवात बदलला.
मुलीला आईची प्रतीक्षा; पण सायंकाळी घरी आला मृतदेह, कुटुंबाचा आक्रोश !
मुक्ताबाई नेवारे यांना दोन मुली. एक मुलगी इंजेवारी येथे दिली आहे, तर दुसरी मुलगी देऊळगावातच नांदते. मुक्ताबाई या बुधवारी दुपारी सरपणासाठी घरापासून अवघ्या अर्था किलोमीटर अंतरावर जंगलात गेल्या. त्यांची मुलगी धान कापणीसाठी शेतावर, संध्याकाळी मुलगी घरी परतली तेव्हा आई दिसेना.
शेजाऱ्यांना विचारले असता 'काडांना गेल्या' इतकीच माहिती मिळाली. सायंकाळ झाली, अंधार वाढला, तरी मुक्ताबाई परतल्या नाहीत. गावकऱ्यांनी पोलिस व वनविभागाला कळवले. अंधारात सुरू झालेल्या शोधमोहिमेत रात्री ७:३० वाजेच्या सुमारास जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. दोन मुलींच्या या आईचा जीव सरपणाच्या चुलीसाठी चुकला.
Web Summary : Two women from Deulgaon, Maharashtra, died after being attacked by a tiger while collecting firewood. Driven by poverty, they ventured into the forest near their village. Their bodies were found after separate searches, highlighting the deadly struggle for survival in the area.
Web Summary : महाराष्ट्र के देउलगाँव में लकड़ियाँ इकट्ठा करते समय बाघ के हमले में दो महिलाओं की मौत हो गई। गरीबी से मजबूर होकर वे अपने गाँव के पास जंगल में गई थीं। अलग-अलग खोजों के बाद उनके शव मिले, जिससे क्षेत्र में जीवन रक्षा के लिए घातक संघर्ष पर प्रकाश डाला गया।